स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला आक्षेप नको; मोहन भागवत यांचं मोठं विधान

आपल्या सुरक्षेसाठी आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे. आपल्या ‘स्व’वर आपण निर्भर असलं पाहिजे. त्यासाठी आपलं सैन्य, शासन-प्रशासनासोबत समाजाचं बळ असणं आवश्यक आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईने देशाचं संरक्षण आणि संरक्षणात्मक सामर्थ्याची क्षमता सिद्ध झाली आहे. या निमित्ताने शासन आणि प्रशासनातील दृढता सुद्धा दिसली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. तसेच स्वइच्छेने केलेल्या धर्मांतराला आक्षेप घेऊ नये, असं मोठं विधान त्यांनी केलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नागपूर येथे कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय)चं आयोजन केलं होतं. दोन दिवस चालणाऱ्या या वर्गाचा काल समारोप झाला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद नेतामही उपस्थित होते. तसेच मंचावर विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, वर्गाचे सर्वाधिकारी समीर कुमार महांती आणि नागपूर महानगर संघसंचालक राजेश लोया उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांनी हे महत्त्वाचं विधान केलं.

संकट कायम आहे

पहलगाममध्ये झालेल्या नृशंस हल्ल्यानंतर देशभरात आक्रोशाची लाट होती. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी ही लोकांची अपेक्षा होती. हा हल्ला करणाऱ्यांवर आपण कठोर कारवाई केली सुद्धा. ही कारवाई करताना देशाच्या संरक्षणात्मक सामर्थ्याची क्षमता सिद्ध झाली. यावेळी शासन आणि प्रशासनाचा निर्धारही पाहिला. संपूर्ण समाजात अभूतपूर्व एकतेचं वातावरण दिसलं. राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकमेकांना साथ देण्याचं काम केलं. देशभक्तीच्या वातावरणात आपण आपले सर्व मतभेद बाजूला ठेवले. देशाचं हे चित्र चिरस्थायी राहिलं पाहिजे. पण या कारवाईनंतरही समस्या संपलेली नाही. संकट अजून कायम आहे, असं मोहन भागवत म्हणाले.

द्विराष्ट्रवादाचं भूत कायम

अजूनही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. द्विराष्ट्रवादाचं भूत कायम आहे. दहशतवाद आणि सायबर युद्धाचा आधार घेऊन प्रॉक्सी वॉर सुरू आहे. युद्धाचे प्रकार बदलत आहेत. त्यामुळेच आता जगातील इतर देशांचीही परीक्षा होत आहे. सत्यासोबत कोण उभं राहतो आणि कोण स्वार्थी आहे, याचीही परीक्षा झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला आपल्या संरक्षणासाठी आत्मनिर्भर झालं पाहिजे. शासन आणि प्रशासनाने त्या दिशेने पावलं उचलली पाहिजे. त्यासाठी समाजशक्तीने दृढतेने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, असं मत भागवत यांनी व्यक्त केलं.

हाच खरा धर्म

देशाच्या समोरील संकट पाहिले असता समाजाने एकतेने मजबूत होणं आवश्यक आहे. आपला देश विविधतेने नटलेला आहे. देशात अनेक समस्या आहेत. अनेकदा तर एकाची समस्या दुसऱ्याला माहीतही नसते. या सर्व प्रश्नांचा निर्णय घेणे कठिण होतं. पण समाजात संघर्ष होऊ नये यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सद्भावना कायम राहिली पाहिजे. अनावश्यक वाद-विवाद निर्माण होऊ नयेत. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न योग्य नाही. तसेच आपल्या स्वार्थासाठी समाजात भेद निर्माण करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नये. एक दुसऱ्यांच्या बाबत सद्भावना, सद्विचार आणि सहकार्य असलं पाहिजे. आपलं मूळ म्हणजे एकता आहे. विविधतेता एकतेची ओळख आपण निर्माण केली आहे. हाच भारताचा खरा धर्म आहे. आपल्या सर्वांसाठी मूल्य व्यवस्था समान आहे. आपले पूर्वज एक आहेत. वास्तवात संपूर्ण विश्व, संपूर्ण मानव समाज एक आहे. त्यासाठी आपल्याला तयार राहिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला…

विकास आणि पर्यावरण या दोन्ही गोष्टी एकत्रित राहू शकतात. आदिवासी हे आपलेच बांधव आहेत. ते आपल्या समाजाचाच एक भाग आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या आपण निश्चितपणे शासनापुढे मांडणार आहोत. त्यासाठी आमची एक कार्यपद्धती आहे. शासन आपलं काम करेल. आमच्या विविध संघटनांच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी वनवासी भागात खूप काम केलं आहे, असं ते म्हणाले.

स्वतःच्या इच्छेने केलेल्या धर्मांतराला कोणताही आक्षेप नसावा. पण जबरदस्ती, आमिष दाखवून किंवा फसवून धर्मांतर होऊ नये. आम्ही कोणत्याही पंथाच्या विरोधात नाही. जबरदस्तीने धर्मांतरित झालेले लोक जर स्वधर्मात परत यायचे ठरवत असतील, तर त्याचे स्वागतच आहे. संघ आणि समाज एकत्र येऊन नक्षलवाद आणि धर्मांतराच्या समस्येचं निराकरण करू शकतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संघाला आवाहन

समारंभाचे प्रमुख अतिथी अरविंद नेताम यांनीही आपली भूमिका मांडली. धर्मांतर आणि नक्षलवाद या दोन समस्या आदिवासी समाजात ठळकपणे आहेत. या समस्यांवर आदिवासी समाज आणि संघाने एकत्रितपणे काम करायला हवं. संघ आणि समाज मिळून या समस्यांचे निराकरण करू शकतात. केंद्र सरकारने नक्षलवादावर परिणामकारक कार्य केले आहे, पण त्याचे मुळापासून उच्चाटन होणे आवश्यक आहे. उदारीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे आदिवासींना विस्थापित व्हावे लागत आहे.

ही त्यांच्यासाठी एक गंभीर समस्या आहे. यामुळे जल, जंगल आणि जमीन संकटात आले आहेत. विकास होत असतो, पण त्या विकासात आदिवासींचा सहभाग निश्चित असायला हवा, असं अरविंद नेताम म्हणाले. जमीन संपादनाऐवजी ती लीजवर घेतली पाहिजे. संघ आणि आदिवासी समाजामध्ये चर्चा सतत होत राहायला हवी. संघाने जो डिलिस्टिंगचा आंदोलन उभारला आहे, तो चांगला आहे. धर्मांतराविरोधात राज्य व केंद्र सरकारने कठोर कायदे करायला हवेत, असंही ते म्हणाले.

कार्यकर्ता विकास वर्ग

या वर्गाचे उद्घाटन १२ मे रोजी झाले. देशभरातील विविध प्रांतांमधून ८४० शिक्षार्थी आणि संघाच्या नियोजनातून तयार झालेल्या ४६ प्रांतांमधून ११८ शिक्षक सहभागी झाले. दक्षिण क्षेत्रातून १७८, पश्चिम क्षेत्रातून ८६, मध्य क्षेत्रातून ११२, राजस्थानमधून ७९, उत्तर क्षेत्रातून ७७, पश्चिम उत्तर प्रदेशमधून ७८, पूर्व उत्तर प्रदेशमधून ७८, बिहारमधून ३९, पूर्व क्षेत्रातून ६७ आणि आसाममधून ४६ शिक्षार्थी सहभागी झाले.

दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले १८, बारावीपर्यंतचे ७९, डिप्लोमा धारक ३१, पदवीधर ३९०, पदव्युत्तर ३७७ आणि पीएच.डी. धारक ५ शिक्षार्थी होते. वर्गवारीनुसार, वकील २८, अभियंते १८, कर्मचारी १५४, कामगार २७, शेतकरी ५५, डॉक्टर ४, पत्रकार ५, प्रचारक/विस्तारक १९१, प्राध्यापक/प्राचार्य १३, लघुउद्योजक ८, लघु व्यवसायिक ६५, विद्यार्थी ६०, अध्यापक ९१ आणि स्वरोजगार करणारे १२१ सहभागी झाले.

विशिष्ट आमंत्रित अतिथी –

१) बिल शुस्टर – पेन्सिल्व्हेनियाच्या नवव्या जिल्ह्याचे माजी अमेरिकी खासदार आणि हाऊस ट्रान्सपोर्टेशन कमिटीचे माजी अध्यक्ष

२) बॉब शुस्टर – सार्वजनिक धोरण आणि व्यवसायाचे तज्ञ वकील आणि वन+ स्ट्रॅटेजीजचे संस्थापक भागीदार

३) ब्राडफोर्ड एलिसन – धोरण अभ्यासक तसेच तपास व आर्थिक नियमांचे तज्ज्ञ

४) प्रा. वॉल्टर रसेल मेड – प्रसिद्ध शिक्षाविद, लेखक, आंतरराष्ट्रीय संबंध, धोरण आणि रणनीती अभ्यासक, हडसन आणि फ्लोरिडा विद्यापीठाशी संलग्न, एस्पेन इन्स्टिट्यूट इटलीशी संबंध

५) बिल ड्रेक्सेल – कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानात रस, हडसन विद्यापीठातील फेलो, भारत-अमेरिका संबंधांचे तज्ञ, द वॉशिंग्टन पोस्ट, सीएनएन आणि द वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये योगदानकर्ते

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)