राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर रोज बोलत आहेत. त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच मनसे नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट करतानाच ठाकरे गटासमोर सर्वात मोठी अट ठरली आहे. आम्हाला दोनवेळेचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पित आहोत. ठाकरे गटाला आमच्यासोबत युती करायची असेल तर आमच्याकडे रितसर प्रस्ताव द्या किंवा उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना फोन करावा. त्यानंतर राज ठाकरे काय तो निर्णय घेतील, अशी अटच मनसेने ठेवली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता राज ठाकरेंना फोन करणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट शिवसेनेच्याच कोर्टात युतीचा चेंडू टोलवला आहे. युतीचा निर्णय निर्णय राज ठाकरे घेत असतात. ठाकरे गटासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही. आमचं तोंड दुधाने पोळलं गेलं आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितोय. जोपर्यंत राज ठाकरेंकडे ठोस प्रस्ताव येत नाही तोपर्यंत निर्णयापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. प्रस्ताव आल्यावर राज ठाकरे योग्य निर्णय घेतील. अमित ठाकरे यांनीही काल तेच सांगितलं. म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.
तोपर्यंत निर्णय कसा घेणार?
2014 आणि 2017च्या घटनांचा मी साक्षीदार आहे. जेव्हा युती करावी अशी आमची भावना होती, तेव्हा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. सुभाष देसाई त्यांना भेटले. युती करावी असा राज ठाकरे यांचा निरोप आहे, असा निरोप घेऊन बाळा नांदगावकर मातोश्रीत गेले होते. याला म्हणतात प्रस्ताव. तसा कोणताही प्रस्ताव आता ठाकरे गटाकडून आमच्याकडे आला नाही. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत राज ठाकरे कसा निर्णय घेऊ शकतात? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
आमची महापालिकेची तयारी सुरू
पूर्वी ही युती करण्यासाठी शिवसेनेवाले पडद्यामागे सकारात्मक होते. पण त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं नाही. उद्धव ठाकरेंचा आधी फोन येऊ द्या, निर्णय घेण्याचा अधिकार राज ठाकरेंचा आहे ना?, असं सांगतानाच आमची महापालिकेची तयारी सुरू आहे. जेव्हा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे निर्णय घेतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ठिक आहे, परिवर्तन होत आहे
संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या घराला कॅफे म्हणून हिणवायचे. मात्र, आज राऊत यांनी आमच्यासाठी राज ठाकरे यांचं घर हे दुसरं घर आहे, असं विधान केलं. त्यावरून संदीप देशपांडे यांनी राऊत यांना टोले लगावले. पुस्तक लिहिल्यानंतर राऊत यांच्या विचारात परिवर्तन झालं असेल तर स्वागत करतो. परिवर्तनही संसार का नियम आहे, असं गीता सांगते. त्यांनी गीता वाचली असेल तर स्वागत आहे. कॅफे हे राऊतच म्हणाले होते. घरही तेच म्हणत आहेत. परिवर्तन होत आहे, असा चिमटा देशपांडे यांनी काढला.
दरम्यान, अविनाश जाधव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे. हेच काल अमित ठाकरे यांनी सांगितलं. अख्ख्या शिवसेनेला मनसे सोबत युती हवी असेल तर उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरेंचा नंबर आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी घडणार असेल तर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना एक कॉल करावा. कॅमेऱ्यासमोर जे नेते बोलत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगावं की राज ठाकरेंशी बोला. मी खात्रीने सांगतो, तुम्ही एक पाऊल पुढे या साहेब 100 पावलं पुढे येतील. 2014 आणि 2017चा आम्हाला वेगळा अनुभव आहे. कॅमेऱ्यासमोर काय युती होते का?, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला.