रवींद्र वायकर ‘शिवतीर्थ’वर, राज ठाकरेंशी भेट; EVM हॅकिंगवर म्हणतात, मोदींनीही ४०० पार…

मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंगळवारी सकाळीच वायकर दाखल झाले होते. निवडणुकीतील सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती वायकरांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. भेटीत राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचा उल्लेख करतानाच वायकरांनी गप्पांचा तपशील मात्र गुलदस्त्यात ठेवला आहे.

राज ठाकरेंची सदिच्छा भेट

मी लोकसभा निवडणुकी आधीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटलो होते. त्यांचे आशीर्वाद घेतले, निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांचं सहकार्य मिळालं, याबद्दल आभार मानण्यासाठी आलो होतो, असं सांगतानाच गप्पांचा नेमका तपशील सांगणं मात्र वायकरांनी टाळलं. वायकर-राज ठाकरे भेटीचे फोटो समोर आले असून त्यात राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेत्या शालिनी ठाकरेही दिसत आहेत.
RSS : विधानसभेलाही विरोधक फेक नरेटिव्ह मांडतील, प्रत्युत्तर द्या; संघाचा भाजपला सल्ला

रवींद्र वायकर काय म्हणाले?

दरम्यान, निवडणूक मतमोजणी केंद्रावर फोन मिळाला, मात्र त्याआधारे हॅक करता येतं, हे प्रूव्ह करुन दाखवावं, असं आव्हान रवींद्र वायकर यांनी विरोधकांना केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीही ४०० पार म्हणाले होते, मग त्यांनाही ‘असं काही’ करता आलं असतं. मोबाईलने हॅक करता येतं, हे सिद्ध केलं तर जगालाही कळेल, की अशाप्रकारे हॅकिंग शक्य आहे. त्यामुळे टीकाकारांनी जरुर ते सिद्ध करावं, असं वायकर म्हणाले.
MVA Meeting : विधानसभेचं जागावाटप कशाच्या आधारे? महाविकास आघाडीचा निकष ठरला, संयुक्त जाहीरनामाही काढणार
खुशाल कोर्टात जा, ही लोकशाही आहे. ही माझीही आठवी टर्म आहे, मोबाईल आजकाल सगळ्यांकडे असतो. त्यावेळी अनेकांकडे असेल, पण जर हॅक केल्याचं सिद्ध केलंत, तर बघू, असं वायकर म्हणाले.

त्या दिवशी काय घडलं?

मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी ५.५१ वाजता आम्ही टीव्हीवर पाहिलं की अमोल कीर्तिकर २२०० मतांनी विजयी. मी कोणाला विचारणार, रिटर्निंग ऑफिसरला विचारु शकतो, त्याआधी मी वृत्तवाहिन्यांनाही फोन करुन विचारलं की कशाच्या आधारे चालवताय? ५.५१ वाजता एक लाखांहून अधिक मतांची मोजणी बाकी असताना कशी घोषणा झाली? मी सहा वाजता मतमोजणीच्या ठिकाणी गेलो, तर ते म्हणाले आम्ही काही घोषित केलेलं नाही, असं वायकर म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

बॅलेट पेपरची मोजणी सकाळी आठ वाजता झाली. मला प्रत्येक फेरीचे आकडे कळत होते. ईव्हीएम ज्यावेळी चेक केलं, तेव्हा कीर्तिकर एकने प्लस होते. जर हॅक करायचं होतं, तर मी दोन-चार हजारांनी प्लस गेलो असतो, ते कसे प्लस असते. पण मला बॅलेट पेपरने वाचवलं… ती टोटल केली, तेव्हा ४८ मतांनी मी प्लस झालो. २० उमेदवार त्यावेळी आत होते, त्यांचे प्रतिनिधी आत होते, मी नव्हतो. मोबाईल सगळ्यांकडे असतील, पण हॅक करता येतं का, हा प्रश्न असल्याचं वायकर म्हणाले. मला फक्त १३ दिवस प्रचारासाठी मिळाले होते, पराभव मोठ्या मनाने मान्य करायला हवा, तुमचेही खासदार निवडून आलेत, मग ते हॅक करुन आले का? असा प्रतिप्रश्न वायकरांनी विचारला.