Weather Update: पुढील ५ दिवस महत्त्वाचे, कोकण-विदर्भाला यलो अलर्ट, या शहरांत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालेला पाहायला मिळत आहेत. मान्सूनने यंदा वेळेपूर्वीच राज्यात प्रवेश केला. मात्र, त्यानंतर पावसाला ब्रेक लागला. आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर आता मान्सून राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात मोसमी वारे वाहू लागल्याने पावसाला पोषक असं वातावरण निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस बरसण्याची चिन्ह आहेत. येत्या ४८ तासात राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई-उपनगरात पावसाची रीएन्ट्री

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांतून पाऊस गायब झाला होता आणि नागरिकांना पुन्हा एकदा उकाड्याचा सामना करावा लागला. मात्र, सोमवारी पुन्हा एकदा पावसाने मुंबईसह उपनगरात हजेरी लावली. मुंबईसह कोकणातही जोरदार पाऊस बरसला. तर आज आणि उद्याही कोकणला मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडला मुसळधार पावसाचा इशारा

यादरम्यान, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाच्या सरी कोसळतील.

पुणे, साताऱ्यालाही पावसाचा यलो अलर्ट

त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा येथेही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, विदर्भालाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातही मुसळधार पाऊस

पुढील पाच दिवसांत मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर नांदेड येथे जोरदार पाऊस होईल. तर विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.