Sangli: विधानसभेत सांगतील किती जागा लढवणार? चंद्रहार पाटलांनी आकडा सांगितला

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते जरी सांगत असले की ते विधानसभा एकत्रच लढणार आणि त्यांच्यात काहीही मतभेद नाहीत. तरी, स्थानिक पातळीवर मात्र असं दिसून येत नाही. सांगली जिल्ह्यात विधानसभा लढवण्यावरून महाविकास आघाडीतील तिढा वाढणार असल्याची चिन्ह आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पाठोपाठ आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील सांगली जिल्ह्यातील २ विधानसभा जागा लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा जागा लढवणार असल्याचं सांगली लोकसभेचे उमेदवार राहिलेले चंद्रहार पाटील यांनी सांगितलं आहे. खानापूर-आटपाडी आणि मिरज या दोन विधानसभेच्या जागा ठाकरे गट लढवणार असल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं.

लोकसभेत शिवसेना पक्षाबरोबरच महाविकास आघाडीशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने गद्दारी केली, त्याबाबाबत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माफ देखील केलं. मात्र, भविष्यात जर त्या पद्धतीने प्रयत्न झाला तर याची किंमत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल, असा इशाराही यावेळी चंद्रहार पाटील यांनी दिला.

सांगली जिल्ह्यात जास्तीत जास्त विधानसभा लढण्याचा काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढलेलं पाहायला मिळत आहे. यातच आता सांगली जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा ठाकरेंची शिवसेना लढणार असण्याचा दावा चंद्रहार पाटील यांनी केलाय. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा आणखीन वाढण्याची शक्यता. सांगली जिल्ह्यातील मिरज आणि खानापूर- आटपाडी विधानसभा लढविण्याचे संकेत चंद्रहार पाटील यांनी दिलेत. सांगली लोकसभा चंद्रहार पाटील यांनी लढली होती. परंतु त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना पक्षाबरोबरच महाविकास आघाडीसोबत गद्दारी केली होती. परंतु त्याला आता उद्धव ठाकरे यांनी माफ केले आहे. परंतु भविष्यात जर अशा पद्धतीने गद्दारी झाली. तर त्याची किंमत महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल, असे सांगत चंद्रहार पाटील यांनी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला.

इस्लामपूर येथील कार्यक्रमात जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वाधिक जागा लढेल असे सांगितले होते. तर सांगली मधील विशाल पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमात काँग्रेसच विधानसभेच्या जास्त जागा लढेल असे विश्वजीत कदम यांनी सांगितले होते. यातच आता सांगली जिल्ह्यातील मिरज आणि खानापूर-आटपाडी या दोन विधानसभा ठाकरेंची शिवसेना लढणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितल्याने सांगली पुन्हा एकदा चर्चेत येणार असून सांगलीमुळे पुन्हा महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.