Raj Thackeray: २० जागा लढणार असल्याची पुडी कुणी तरी सोडली; २० जागा का? आपण २०० ते २२५ जागा लढवित आहोत, पण…

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेकडे मनसे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीकरिता जास्तीत जास्त जागा लढण्याची तयारी पक्षाकडून करण्यात येणार असून लवकरच प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. निरीक्षकांच्या अहवालानंतरच नेमक्या किती जागा लढणार असल्याचे जाहीर करण्यात येणार असल्याचे संकेत, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत पक्षाच्या बैठकीत दिले. त्याचवेळी मनसे २० जागा लढणार असल्याच्या चर्चेचा राज ठाकरे यांनी पूर्णविराम लावल्याने मनसे स्वबळावर लढणार असल्याची नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वरील संकेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. आगामी निवडणुकीकरिता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. तर लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मराठी माणसांनी अपेक्षेप्रमाणे मतदान केले नाही, मुस्लिमांनी मतदान केले, असा दावाही राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थितांसमोर केला.
Chandrakant Patil उद्धव ठाकरे प्रेमाने विचारतोय, तुम्ही काय मिळवले? तुमचे १८चे ९ झालेत, चंद्रकांत पाटलांची टीका

आगामी विधानसभेसाठी मनसे २० जागा लढणार असल्याची पुडी कुणी तरी सोडली. २० जागा का, आपण २०० ते २२५ जागा लढवित आहोत. लवकरच प्रत्येक जिल्ह्यासाठी नेमणुका करण्यात येतील. हे निरीक्षक पक्षातील पदाधिकारी, विविध समाजाच्या प्रतिनिधी याशिवाय इतरांशी चर्चा करुन संबंधित मतदारसंघाबाबत अहवाल तयार करतील. या अहवालानंतर आपण पुढील भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिल्याचे कळते.
Terrorism In J&K: शत्रूसाठी काम केल्यास पश्चाताप होईल, पोलिस महासंचालकांनी स्थानिकांना दिला सज्जड इशारा; काश्मिरात शोधमोहीम तीव्र

त्याचबरोबर महाविकास आघाडीला झालेले मतदान हे मोदी विरोधातून झाले आहे. ते महाविकास आघाडीवरील प्रेमातून झालेले नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मराठी माणसांनी अपेक्षेप्रमाणे मतदान केले नाही. तर मुस्लिमांनी मतदान केले आहे. त्यातच शिवसेनेतून ४० आमदार फुटले तिथपर्यंत ठीक होते, पण धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचे नाव काढून घेतले ते लोकाना पटले नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मनसे अध्यक्षपदी राज ठाकरेच

पक्षाच्या अध्यक्ष पदी राज ठाकरे यांच्या नियुक्ती करण्याचा ठराव गुरुवारी पक्षाच्या सरचिटणीस आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी यासंदर्भातील ठराव मांडला होता. त्याला नितीन सरदेसाई यांनी अनुमोदन दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच सर्व नेमणुका करण्याबाबतच आणि पक्षातील सर्वाधिकार घेण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला आहे. त्याबरोबर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे अधिकारही राज ठाकरे यांच्याकडेच असतील, असाही एक ठराव गुरुवारी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, २०२३ ते २०२८ या कालावधीकरिता राज ठाकरे यांची अध्यक्षपदाची निवड यावेळी करण्यात आली आहे.