लाडकी बहीण योजना ही सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे, गेल्या जून महिन्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती, आता या योजनेला जवळपास एक वर्षाचा कालावधी होत आला आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. आमचं सरकार पुन्हा आलं तर आम्ही लाभार्थी महिलांना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्राचारावेळी केली होती. राज्यात आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मात्र अजूनही 2100 रुपयांबाबत कोणताही निर्णय घेण्यत आलेला नाहीये.
दरम्यान दुसरीकडे या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याची चर्चा आहे. सरकार लवकरच ही योजना बंद करणार असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जात आहे, तसेच इतर योजनेचे पैसे या योजनेकडे वळवण्यात येत असल्याचा आरोप देखील विरोधक करत आहेत. त्यामुळे ही योजना सध्या चांगलीच चर्चेत आहेत. या योजनेबाबत बोलताना अर्थमंत्री अजित पवार यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे. ते रत्नागिरीमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अर्थसंकल्पात मी सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता लांबणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबत आमचे विरोधक कारण नसताना चर्चा करत असतात, की या योजनेचे पैसे आता सरकार थांबवणार, त्यांची गरज आता संपली आहे, गरज सरो वैद्य मरो आशा चर्चा करत असतात. मी असं करणार नाही, राष्ट्रवादी पक्षाची ती भूमिका नाही. संपूर्ण महायुतीची तशी भूमिका नाही मुख्यमंत्री किंवा शिंदे साहेबांची ती भूमिका नाही.आम्ही तुम्हाला दिलेली ही भाऊबीज आहे, रक्षाबंधन भेट आहे. त्यामुळे ही योजना चालूच राहील. ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे, अशांकरिता ही योजना आहे. एका योजनेचा लाभ मिळत असेल, तर या योजनेचा लाभ मिळणार नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.