उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला आहे. ते महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्य अधिवेशनात पालघरमध्ये बोलत होते. ‘१२ वी नंतर शिक्षण सोडलं, पण मी माझ्या मुलाला डॉक्टर केलं. एज्युकेशन इज द मोस्ट पावरफूल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ड’ असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शिक्षणावर विशेष भर दिलेला आहे आणि म्हणूनच नवीन शिक्षण धोरण हा त्याचाच एक परिपाक आहे. शिक्षकांना वंदन करायचं नाही तर कुणाला वंदन करायचं? सगळ्या वैयक्तिक कौटुंबिक समस्या चिंता पोटात घेऊन नव्या पिढीला घडवण्याचं काम शिक्षक करत आहेत, या देशाची नवी पिढी आपण घडवत आहोत. महाराष्ट्राची भावी पिढी घडवणारे हे सर्व शिल्पकार आहेत . आई वडिलांनंतर शिक्षकांचा व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाचा रोल असतो. पेसा शिक्षक निर्णय देखील पुढच्या कॅबिनेटमध्ये निकाली लागेल, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 12 वी नंतर शिक्षण सोडलं . पण लोकांमध्ये गेल्यावर खर शिक्षण मिळालं . डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन मी पण करतो . शिक्षण नसलं तरी 2022 ला परीक्षा द्यायला गुवाहाटीला गेलो होतो . आता थोडं बाकी राहिलंय ते ही होईल, असं म्हणत त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता खोचक टोला लगावला आहे.
दरम्यान शिक्षक आमदार आपल्या समस्या सोडवतील , लाडक्या बहीण, लाडके भाऊ, शेतकरी यासाठी आपल्या सरकारंनं अनेक निर्णय घेतले आहेत. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी महाराष्ट्रामधील जनतेला सोन्याचे दिवस आणणारे काम करणार आहे. गुरू प्रत्येकाला लागतो, गुरू शिवाय काही नाही, समाजाचा दोष दूर करण्यासाठी गुरू असावा लागतो, शिक्षक महत्वाचा घटक आहे , कोणाला पुढे न्यायचं , कोणाचा टांगा पलटी करायचा हे आम्हाला माहिती आहे. आम्ही प्रिंटिंग मिस्टेकवाले नसून, वचननाम्याप्रमाणे आश्वासन पाळण्याचं काम आमचं सरकार करत आहे, असं म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांनाही टोला लगावला आहे.