Pahalgam Terror Attack : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील 2 पर्यटकांचा मृत्यू, महाराष्ट्रातील 6 जण दगावले

काश्मीरमधील हल्ल्यात पुण्यात दोघांचा मृत्यूImage Credit source: social media

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात अनेक भारतीय नागिरकांचा तसेच परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जण दगावले आहेत. त्यामध्ये पुण्यातील पर्यटकांचाही समावेश आहे. तसेच डोंबिवलीमधील 3 आणि नवी मुंबईतील 1 पर्यटक या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणवोटे या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

पुण्यातील दोघांचा मृत्यू

काल दुपारी झालेल्या हल्ल्यात आत्तापर्यत 30 जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक जखमीही झालेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील संतोष जगदाळे हे देखील या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संतोष जगदाळे यांच्या कुटुंबियांशी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काला फोनवरून संवाद साधला होता. आज संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील एकूण 6 जमांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. जगदाळे आणि गणवोटे या दोघांचं पार्थिव आज पुण्यात आणलं जाणार आहे.

पुण्यातील दोन कुटुंबं ही काश्मीरला फिरायला गेले होते. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणवोटे हे कुटुंबियांसाह पहलागामला पर्यटनासाठी गेले होते. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, काल दहशतवाद्यांनी केलेलेल्या भ्याडल हल्ल्यात गोळी लागून जगदाळे आणि गणवोटे हे जखमी झाले होते, त्यांचा आजा मृत्यू झाला कालपासून जगदाळे यांच्या घरी त्यांच्या नातेवईकांनी गर्दी केली होती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हेही या कुटुंबियांच्या संपर्कात आहेत. संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांचं पार्थिव पुण्यात आणण्यात येईल.

दरम्यान एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पुण्यातील पर्यटक आसावरी जगदाळे यांनी या हल्ल्याचं धक्कादायक वर्णन केलं. “गोळीबार झाल्यानंतर आम्ही भीतीने तंबूत शिरलो. त्यांनी माझे 54 वर्षीय संतोष यांना बाहेर बोलावून कुराणातील ओळी (कलमा) म्हणण्यास सांगितलं. त्यांनी जेव्हा म्हटल्या नाहीत तेव्हा त्यांना डोक्यात, पाठीत आणि कानात गोळ्या घातल्या,” असं आसावरी यांनी सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

डोंबिवलीतील 3 मावसभावांचा मृत्यू

दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 मावसभावांचा मृत्यू झाला. डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी अशी मृत्यू झालेल्या मावसभावांची नावे आहेत. संजय लेले हे आपल्या कुटुंबसोबत डोंबिवलीतील श्री विजयश्री हाउसिंग सोसायटीमध्ये वास्तव्य करत होते. महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अद्यापही जम्मू – काश्मीरमध्ये अडकले आहेत अशी माहिती देखील समोर येत आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)