पुढच्या चार सहा महिन्यात मला राज्यातील सरकार बदलाचंय, शरद पवार यांचा निर्धार

मुंबई : माझ्या हातात देशाचे कृषिमंत्रिपद होते तेव्हा मी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. शेवटी सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी करायचो असतो. परंतु आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांचे हित कळत नाही. मला तुमच्या पाण्याचा, दूध दरवाढीचा प्रश्न समजतोय. जरा थोडे थांबा… पुढच्या चार सहा महिन्यांत मला राज्यातील सरकार बदलायचे आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. यानिमित्ताने पवार यांनी लोकसभा निकालाच्यापाठोपाठ विधानसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जाते.

ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी इंदापूर तालुक्यातील नीरा खोऱ्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी निरवांगी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी पवार यांनी समजून घेतल्या. भीषण दुष्काळ तसेच दूध दरवाढीच्या प्रश्नावर त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.
Sharad Pawar: आज मोदी सरकार राहिले नाही व मोदी गॅरेंटीही राहिली नाही; शरद पवारांची जोरदार टीका

दूध उत्पादकांना पाच रुपयांचं अनुदान शंभर टक्के टक्के मिळालेच पाहिजे

दूध उत्पादकांना पाच रुपयांचं अनुदान शंभर टक्के टक्के मिळालेच पाहिजे. आजच्या घडीला संसार चालवायला दुधाचा धंदा हा एकमेव धंदा आहे. जेणेकरुन प्रपंच चालतो. दुधाच्या दरवाढीसंबंधीचा प्रश्न सरकारला सांगून बघू. जर सरकारने ऐकले नाही तर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा, असा सूचक इशारा देताना सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजेत ते निर्णय घेता येत नाहीत. थोडे थांबा मला चार सहा महिन्यात राज्यातील सरकार बदलायचे आहे, असे पवार म्हणाले.

आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना शेतकरी घटकाविषयी आत्मियता नाही

माझ्याकडे १० वर्ष देशाच्या शेतीचे खाते होते. त्यावेळी मी संबंध देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शेतीमालाचे भाव वाढवून दिले. दुधाला दरवाढ दिली. शेवटी सत्तेचा वापर लोकांसाठी करायचे असतो. पण आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना शेतकरी घटकाविषयी आत्मियता नाही, अशी टीका पवार यांनी केली.