ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला

शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली विचारधारा सोडली आहे, त्यांनी आपल्या पक्षाचे, वडिलांचे विचार सोडले आहेत, त्यांनी आता कोणाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची सुरुवात आता माझ्या शिवसेनेच्या बांधवांनो व भगिनींनो अशी होते. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवात हिंदू माता भगिनींनो आणि मित्रांनो अशी होत होती. भाषणाच्या सुरुवातीचे वाक्य उद्धव ठाकरे यांनी गाडले आहे, त्यामुळे आता त्यांनी बाकीच्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही, असा टोला पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

बाळासाहेबांच्या एआय भाषणावर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी जोरदार टोला लगावला आहे. ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता बाळासाहेबांचे भाषण दाखवून उपयोग नाही, बाळासाहेबांनी त्यावेळेस काय विचार मांडले होते. पक्ष कसा स्थापन केला होता? आणि आता आपण काय करतोय? त्यामुळे हे बाळासाहेबांचे भाषणं त्यांनीच आता पहावे असा टोला यावेळी गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख हे दैवत आहेत आणि ते दैवत सर्वांचं आहे. पण ते वारसदार फक्त प्रॉपर्टीचे आहेत, त्यांच्या विचारांचे नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्यामुळे जेवढं काम आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या काळात केलं नाही तेवढं आम्ही केलं आहे.  आदित्य ठाकरे यांनी आजोबांचा फोटो लावून स्वतःचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आम्ही आजोबांचं नाव उंचावलं आहे. आम्ही आजोबांचे विचार पुढे नेत आहोत, हाच आमचा आणि त्याच्यातील फरक आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

शालेय अभ्यासक्रमात हिंदीच्या सक्तीवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसेनं या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. यावर आता गुलाबराव पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत आशिष शेलार व शिक्षण मंत्र्यांनी खुलासा केलेला आहे. राज ठाकरे यांनी या गोष्टी समजून घ्याव्यात, त्यानंतर आपण निर्णय घेऊ, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)