Ghatkopar Hoarding Collapse जखमी मदतीच्या प्रतीक्षेत; नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून दिले जाणार अर्थसाह्य

मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत सरकारने घोषित केली होती. मात्र, आता या दुर्घटनेला नैसर्गिक आपत्तीचे निकष लावून जखमींना मदत देण्यात येणार आहे. सातपेक्षा कमी दिवस रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींना ५,४०० रुपये, सातहून अधिक दिवस वैद्यकीय उपचार घेणाऱ्या जखमींना १६ हजार रुपयांची मदत सरकार देणार आहे. अद्याप एकाही जखमीला ही मदत मिळालेली नाही, मात्र येत्या दोन दिवसांत हे धनादेश निघतील, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.सर्व नियम पायदळी तुडवून उभारण्यात आलेल्या होर्डिंगमुळे १७ जणांना प्राण गमावावे लागले. तरीही हे होर्डिंग पावसाळी परिस्थिती आणि वादळी वाऱ्यामुळे खाली कोसळले, असा अत्यंत असंवेदनशील तर्क लावण्यात आला आहे. त्यासाठी २७ मार्च, २०२३ रोजीच्या महसूल व वनविभागाच्या शासननिर्णयाचा दाखला देण्यात आला आहे. या दुर्घटनेला एक महिना होत आला तरी जखमींना कोणतीही मदत मिळालेली नाही.

ही मदत किती दिवस पुरणार?

या दुर्घटनेतील अनेक जखमींना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. काही जणांच्या हातपायांना, मणक्याला मार बसला आहे. या जखमा पूर्णपणे भरून येणाऱ्या नाहीत. त्यासाठी दीर्घकाळ उपचार घ्यावे लागणार आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनाशुल्क वैद्यकीय उपचार झाले असले तरीही दोघांवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या दुर्घटनेतील धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशनासारखी मदतही घ्यावी लागेल. रोजगार गमावलेल्या या जखमींना आयुष्याची नव्याने सुरुवात करण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागेल. सोळा हजार रुपयांची ही आर्थिक मदत कधीपर्यंत पुरणार, या प्रश्नावर सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.

होर्डिंग दुर्घटनेतील मृत्यू नैसर्गिक कसे?

केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या व्यक्तींना २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीमध्ये द्यायच्या मदतीचे निकष या दुर्घटनाग्रस्तांना लावण्यात आले आहेत. या निधीमध्ये केंद्र सरकारकडून ७५ टक्के व राज्य सरकारकडून २५ टक्के यानुसार मदत देण्यात येते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, हिमवर्षाव, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट या बारा नैसर्गिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना ही मदत मिळू शकते. केंद्र सरकारने ठरवलेल्या बारा नैसर्गिक आपत्तींव्यक्तिरिक्त राज्य सरकारने ३० जानेवारी, २०२४च्या शासननिर्णयानुसार अवेळी पाऊस, अतिवृष्टी वीज कोसळणे, समुद्राचे उधाण, आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या पीडितांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. यात होर्डिंग पडून झालेल्या जखमींना तसेच मृतांच्या वारसांना देण्यात येणारी मदत कोणत्या गटामध्ये बसवण्यात आली, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

सातपेक्षा अधिक दिवसांचा निकष

या दुर्घटनेमध्ये एकूण ७० जण जखमी झाले, तर सतरा जणांचा मृत्यू झाला. सात दिवसांपेक्षा अधिक दिवस रुग्णालयामध्ये राहिलेल्यांची संख्या तेरा इतकी आहे. त्यांना १६ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. सातहून कमी दिवस रुग्णालयामध्ये राहावे लागलेल्या जखमींना ५ हजार ४०० रुपयांची मदत मिळणार आहे. तीस जण हे किरकोळ जखमी आहेत. त्यामुळे त्यांची नावे यादीत समाविष्ट करून घेण्यात आलेली नाहीत. ते मदतीच्या निकषामध्ये बसत नाहीत, असे मुलुंड कार्यालयातील महसूल सहायक विनायक किस्ते यांनी सांगितले.
पद शिपाई, थाट साहेबासारखा! नाशिक सिव्हिलमधील एकाला ACBकडून अटक, बिले मंजुरीसाठी उकळायचा पैसे
मृतांच्या वारसांना नऊ लाखांची मदत

‘महाराष्ट्र टाइम्स’ने या दुर्घटनेमधील मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांकडे विचारणा केली असता, बारा जणांना नऊ लाख रुपयांचे धनादेश मिळाले असल्याची माहिती मिळाली. या दुर्घटनेतील राजू सोनावणे यांच्या कुटुंबीयांना दिलेला पाच लाख रुपयांचा धनादेश वटला नाही. चार लाख रुपयांचा दुसरा धनादेश वटला आहे. धनादेश दिल्यानंतर संबंधित बँकेकडे या संदर्भातील पत्र द्यावे लागते. निवडणुकीच्या कामातील व्यग्रतेमुळे हे पत्र देता आले नाही, असे स्पष्टीकरण सोनावणे कुटुंबीयांना देण्यात आले आहे. दुर्घटनेतील मृत राकेश सोनावणे यांच्या कुटुंबीयांची वारसनिश्चिती झालेली नाही. त्यांचे कुटुंबीय गावी निघून गेल्यामुळे कुटुंबामध्ये सध्या कोण आहे याची माहिती उपलब्ध नाही.