संजय राऊत यांचे ट्विट…बकरा…अन् दिल्लीतील संदेश…काय आहे अर्थ

खासदार संजय राऊत यांनी शनिवारी एक ट्विट केले आहे. त्या ट्विटबाबत राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. माध्यमांनी राऊत यांना त्या ट्विटचा अर्थ विचारला. त्यांनी त्यातील काही माहिती सांगत संकेत दिले. परंतु स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला. तुम्हीच अभ्यास करा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

काय म्हणाले राऊत

संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटबाबत त्यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील एक बकरा खटकाजवळ उभा आहे. त्याला खटकाच्या लाकडावर उभे करण्यात आले आहे. त्याला कापण्याची तयारी करण्यात आली आहे. त्याला सांगितले फार शहाणपण करु नको. गप्प बस. फक्त बे बे करत राहा, असे दिल्लीतून कोणीतरी त्या बकऱ्याला सांगितले आहे. त्या ट्विटवर खाली लिहिलेले ए सं शी गट लिहिले आहे, त्याचा अर्थ काय? असे विचारल्यावर राऊत म्हणाले, ते तुम्हीच शोधा.

राज्याच्या राजकारणात काही तरी होत आहे. ते योग्य वेळी मी तुम्हाला सांगणार आहे, असे राऊत यांनी म्हटले. हनुमान जयंतीचा उत्सवाबाबत ज्या शोभायात्रा निघाल्या आहेत त्यावर संजय राऊत यांनी टीका केली. हनुमान जयंतीच्या शोभा यात्रा या पद्धतीने निघत नाही. चर्च, मशिदीसमोरुन कधी शोभायात्रा काढण्यात येत नव्हती. या माध्यमातून देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अमित शाह यांच्या दौऱ्यावर राऊत यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी अमित शाह यांची भेट घेतली. त्याबाबत राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांचे अमित शाह हे नेते आहेत. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला जन्म देण्याचे काम अमित शाह यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना शाह यांना भेटावे लागणार आहे. त्यामुळे पुण्यात जावून त्यांनी चर्चा केली असणार, असे राऊत यांनी सांगितले. तहव्वूर राणा याला आणण्याचे काम तत्कालीन काँग्रेस सरकारपासून सुरु होते. त्यामुळे राणा याला आणण्याचे श्रेय भाजपला नाही तर काँग्रेसलाच असल्याचे राऊत यांनी सांगितले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)