Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: मनसे नेते राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडवा मेळाव्यातून विविध विषयांवर हात घातला. औरंगजेबच्या कबरीबाबत काय करावे? याची रोखठोक सूचना मांडली. औरंगजेबची कबर उखडून टाकण्यापेक्षा त्या ठिकाणी काय करावे म्हणजे इतिहास आम्हाला आणि येणाऱ्या नवीन पिढीला समजेल, त्याबाबत राज ठाकरे यांनी विचार मांडले. त्या ठिकाणी फक्त एक बोर्ड लावण्याची सूचना राज ठाकरे यांनी केली.
औरंगजेब जिंकू शकला नाही…
गुढी पाडवा मेळाव्यातून राज ठाकरे म्हणाले, औरंगजेब बादशाह याचे राज्य कुठपासून कुठपर्यंत होते. आफगाणिस्तानपासून दक्षिणेपर्यंत आणि बंगालपर्यंत होते. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुटले अन् महाराष्ट्रात परत आले, त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. औरंगजेबाचा एक मुलगा महाराज गेल्यावर दक्षिणेत आला. त्या मुलाला राहायला जागा संभाजीराजे यांनी दिली. त्याला बरोबर घेतले. हा इतिहास वाचा गेला पहिजे. १६८१ ते १७०७ म्हणजे २७ वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात लढत होता. संभाजी राजांबरोबर लढला. त्यांना क्रूर पद्धतीने मारले. राजाराम महाराज, संताजी धनाजी, ताराराणी साहेब लढल्या. औरंगजेब एकही लढाई जिंकू शकत नव्हता. त्याला शिवाजी नावाचा विचार मारायचा होता. पण जमले नाही. सर्व प्रयत्न केले आणि तो मेला.
औरंगजेबचा कबरीवर असा बोर्ड लावा…
औरंगजेबच्या इतिहासाबाबत राज ठाकरे म्हणले, जगाच्या इतिहासात औरंगजेब वाचला जातो. जगभरातील लोकांना कळते तो काय करायला गेला होता आणि कसा मेला. तिथे शिवाजी महाराजांचे नाव येते. आता औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे. त्या ठिकाणी मोठा बोर्ड लाव. आम्हा मराठ्यांना संपवयाला आलेला औरंगजेब इथे गाडला गेला…, अशी सूचना राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे म्हणाले, औरंगजेब हा आमचा इतिहास आहे. इतिहास कशासाठी वाचायचा. इतिहासातून बोध घेण्यासाठी वाचायचा. अफजल खान आला. प्रतापगडावर मारला गेला. तिथेच त्याची कबर खोदली गेली. पुरून उरीन जो शब्द आहे ना तो हा आहे. शिवाजी महाराजांच्या होकाराशिवाय त्याला पुरला नसेल. त्याची कबर केली ते महाराजांनी सांगितले असेल. जगाला कळू द्या कुणाला मारायला आला अन् काय झाले. मराठ्यांनी ज्यांना गाडले त्याची प्रतिके नष्ट करून चालणार नाही. जगाला कळले पाहिजे आपण त्यांना गाडले, असे राज ठाकरे यांनी म्हटले.