Mansoon Update In Maharashtra : सावधान..! हवामान विभागाने राज्यातील ‘या’ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ केला जारी

मुंबई : सध्या देशासह राज्यभरातील शेतकरी वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचबरोबर मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्यासंदर्भात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने मान्सून बद्दलचे आज (८ जून) नवीन अपडेटस दिले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील २-३ दिवसांत नैऋत्य मान्सून हा मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये, तसेच मुंबईसह तेलंगणाच्या दिशेने पुढे सरकणार आहे. त्याचबरोबर मान्सूनची उत्तर सीमा आता हरणाई, बारामती, निजामाबाद, सुकमा, मलकानगिरी, विझियानगरम या शहरांच्या वरुन जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, मान्सून हा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि दक्षिण छत्तीसगडमधील काही भागामध्ये मान्सून येत्या तीन ते चार दिवसांमध्ये म्हणजेच १० जूनपर्यंत दाखल होणार असल्याचं हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वीच सांगितलं आहे.
Devendra Fadnavis : “नितेशला समज दिले, अजितदादा आणि शिंदेंनी प्रवक्त्यांना समज द्यावी वादग्रस्त बोलणे टाळा” फडणवीसांचा सल्ला

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी

मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह ‘यलो अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. यंदा कमी वेळेमध्ये अधिक पाऊस असा पॅटर्न राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला होता. अगदी तसाच पॅटर्न सध्या पाहायला मिळत आहे. पुण्यामध्ये त्याचा फटका बसला आहे. कात्रज, लोहगाव आणि वडगावशेरीला ढगफुटीसारखा पाऊस पाहायला मिळाला. तर रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर हा दक्षिण भाग सोडला, तर राज्यातील उर्वरित भागात पूर्वमोसमी पाऊस होत आहे.

घराबाहेर पडताना काळजी घ्या

रत्नागिरी, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील काही ठिकाणी पुढील ३ ते ४ तासात विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभाग (मुंबई) च्या वतीने करण्यात आले आहे.