कोकाटे, मुंडेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का?; उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल

राष्ट्रवादीचे दोन्ही मंत्री सध्या विरोधकांच्या रडावर आले आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी विरोधक करत आहेत. तर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनाही मंत्रिमंडळातून काढावं अशी मागणी विरोधक करत आहेत. या दोन्ही मागण्या विरोधकांनी चांगल्याच लावून धरल्या आहेत. आता या दोन्ही मंत्र्यांवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. कोकाटे आणि मुंडे यांचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

काँग्रेस नेते किरण काळे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज गाडगेबाबांचं स्मरण केलं पाहिजे. धर्म जगायचा असतो. सांगायचा नसतो, असं गाडगेबाबा नेहमी सांगायचे. शिवाजी महाराजांनीही दुसऱ्यांचा द्वेष करायला नाही सांगितलं. ज्यांनी धर्माचा खेळखंडोबा केला आहे, त्यांचं मुस्लिम प्रेम कसं आहे. हे मी सांगू शकतो. थोरले की धाकले बंधूंबद्दल मोदींनी आपुलकीने ट्विट केलं आहे. भाजप निवडणुकीपुरती धर्मांधता माजवत आहे. हे देशासाठी योग्य नाही, असं सांगतानाच माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचं रक्षण करणं हे यांचं हिंदुत्व आहे का? न्यू इंडिया इन्शुरन्स बुडाली, ज्यांच्यामुळे बुडाली त्यांचं रक्षण करणं भाजपचं हिंदुत्व आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

अंदाधूंद कारभार

आता राज्य आणि देशात अंदाधुंद कारभार माजला आहे. तो दूर करून हिंदुत्वाचं रक्षण केलं पाहिजे. जनतेला फसवलं गेलं. निवडणुकीत अनेक रेवड्या देऊन फसवलं. आता त्या उघड्या पडत आहेत. त्यामुळे लोकांना दिलासा देणं आपलं काम आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तत्परता दाखवावी

यावेळी कोकाटे यांच्या निकालाची प्रत आली नसल्याचं विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. न्यायालयाने तत्परता दाखवावी. आमच्याबाबतचा निकाल लागला नाही. याबाबत निकाल लागला. त्यामुळे किमान प्रत तरी नार्वेकरांच्या हाती द्यावी. न्यायालयाच्या प्रतीचा मान आदर, सन्मान राखणारे असतील तर आमच्याबाबत दिलेला न्याय दिला तो न्याय कसा होऊ शकतो? असा सवाल त्यांनी केला.

पावत्या घेऊन या

यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली. मी अशा गयागुजऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही. महिला म्हणून त्यांचा आदर आहे. त्यांनी राजकारणात चांगभलं केलं आहे. स्वत: मर्सिडीजमधून फिरतात, लाडक्या बहिणी का उपाशी राहिल्या? असा सवाल ठाकरे यांनी केला. तर, उद्धव ठाकरेंनी त्यांना चार वेळा आमदार केलं. महिला आघाडीचा विरोध असताना त्यांना आमदारकी दिली. विधान परिषदेचं उपसभापती बनवलं. त्यांनी उद्धव ठाकरेंना आठ मर्सिडीज दिल्या का? पावत्या घेऊन याव्या, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)