Ajit Pawar: निवडणूक निकालांवरुन अजितदादा नाराज? एनडीएच्या बैठकीपूर्वी घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित असा फटका बसला आहे. तर यातही अजित पवारांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी सर्वात वाईट होती. राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत चार जागा लढवून केवळ एक जागा जिंकता आली. दरम्यान, निकालानंतर दिल्लीत एनडीएची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार जाणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

मिळालेल्या वृत्तानुसार, अजित पवार आणि त्यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल पटेलही दिल्लीत जाणार नाहीत. अशा स्थितीत अजित पवार निकालावर नाराज आहेत की काय, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ शिंदे या बैठकीला उपस्थित राहणार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासह एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधून लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

लोकसभा निकालानंतर भाजपने आज (५ जून) दिल्लीत एनडीएची बैठक बोलावली आहे. या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नसल्याने ही बैठक अधिक महत्त्वाची ठरत आहे. भाजपच्या २४० जागा कमी झाल्या आहेत. तर, एनडीएला एकूण २९३ जागा मिळाल्या आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी निवडणूक होती आणि त्यात महायुतीला मोठा धक्का बसला. इतक्या कमी जागा मिळतील अशी त्यांना अपेक्षा नव्हती. महयुतीने ४५ + चा नारा दिला होता. मात्र, महाराष्ट्रात त्यांना बहुमतही गाठता आलेले नाही. महाराष्ट्रात भाजपला फक्त ९ जागा मिळाल्या आहेत. तर महायुतीने एकूण १७ जागा मिळवल्या आहेत.