आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये राजारामबापू इन्स्टिट्यूटमधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वस्तीगृह आणि व्यायाम शाळा हॉलचं उद्घाटन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत पत्रकारांनाच टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
माझी पत्रकारांना विनंती आहे, आता नितीन गडकरी हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या चालवू नका. गेल्या काही दिवसांपासून अशाच काही चर्चा सुरू आहेत. त्यावर आता नामांकित पत्रकार सुद्धा बोलू लागले आहेत, याचं आश्चर्य वाटतं. दोन वेगवेगळ्या पक्षातील लोक चांगल्या कामासाठी एकत्र येऊ शकत नाहीत, अशीच पत्रकारांची धारण झालेली दिसत आहे, हे चित्र पाहून मनाला वेदना होतात, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
गडकरी काय म्हणाले?
आजचा कार्यक्रम राजकीय नाही जयंतराव माझे चांगले मित्र आहेत म्हणून मी आलो आहे. आमचे राजकीय विचार वेगळे आहेत, पण मन भिन्नता नाही. जयंत पाटील यांनी यापुढे कृषी क्षेत्रात काम कराव. कोल्हापूर सांगली सातारा या भागात आलं की नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सहकार कृषी शैक्षणिक क्षेत्रात या भागातील अनेकांनी मोठं काम करून ठेवलं आहे. लोकांना वाटत मला इंजीनियरिंग मध्ये खूप काही कळतं मात्र तसं नाही. पेठ ते सांगली रस्ता खूप खराब होता, तीन-चार वर्षात मी यासाठी खूप शिव्या खाल्ल्या. आता या रस्त्याचं 80 टक्के काम पूर्ण झाल आहे, दर्जा सुद्धा उत्तम आहे. भारताला आत्मनिर्भर बनवण्याचं पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे. जगात युवकांची संख्या जास्त असणारा देश म्हणजे भारत. देशाला प्रगत करायचं असेल तर शहारा सोबतच ग्रामीण भागाचा देखील विकास केला पाहिजे. त्या शिवाय भारत आत्मनिर्भर होणार नाही, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.