भाजप प्रवेशाची चर्चा असतानाच नितीन गडकरींसमोर जयंत पाटील यांचं मिश्किल वक्तव्य, म्हणाले…

जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असतानाच आज अनोखी घटना बघायला मिळाली. जयंत पाटील आणि नितीन गडकरी हे एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी जयंत पाटील यांनी एक मिश्किल वक्तव्य केलं.

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं आहे. विशेष म्हणजे जयंत पाटील हे काही दिवसांपासून माध्यमांपासूनही लांब आहेत. त्यामुळे जयंत पाटील नेमके आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यानंतर आज महत्त्वाची घडामोड घडली. जयंत पाटील यांनी इस्लामपूरमधील इंजिनियरिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमंत्रित केलं. जयंत पाटील यांच्या राजाराम बापू पाटील इंजिनियरिंग कॉलेजच्या नवीन वसतीगृहात आणि जिमनॅशियमचं उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी जयंत पाटील यांनी एक मिश्किल वक्तव्य केलं.

“आमच्या पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की, नितीन गडकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश जाणार, अशा बातम्या किमान तयार करु नका”, असं मिश्किल वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. “पत्रकारांनी एक बातमी तयार केली आणि देशभर त्यावर मोठमोठे चिंतन करणारी लोकंही बातम्या तयार करायला लागली. याचं मला मनाला शल्य वाटतं. गडकरी आले, दोन पक्षाची माणसं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाही, अशी धारणा झाली आहे त्याबद्दल न बोललेलं चांगलं”, असंही जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

“नितीन गडकरी यांनी आमच्या प्रगतीशील असणाऱ्या संस्थेला भेट दिली. आमच्या पत्रकारांना माझी एकच विनंती आहे की, गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार अशी बातमी करु नका. तुम्ही कशाचीही बातमी कराल. यावरुन पत्रकारितेचा दर्जा ठरतो. तो तुमच्यावर ठरतो. मी त्यावर रागावणार नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

“पत्रकारांनी एक बातमी तयार केली त्यावर मोठमोठी चिंतन करणारी लोकंही बातमी तयार करायला लागले याचं मला मनाला शल्य वाटतं. गडकरी आले आहेत, दोन पक्षाची लोकं एका व्यासपीठावर चांगल्या उद्देशाने येऊ शकत नाही, अशी धारणा असणाऱ्यांबद्दल न बोललेलं चांगलं. शेवटी आज या ठिकाणी रतन टाटा यांच्यापासून अनेक मान्यवरांनी या संस्थेला भेट दिली आहे. अनेक विरोधी पक्षाचे नेते या ठिकाणी येऊन गेले आहेत. नितीन गडकरी आमच्या विनंतीला मान ठेवून आले त्याचं मी या भागातील जनतेच्या वतीने मन:पूर्वक स्वागत करतो”, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले.

नितीन गडकरींना निमंत्रण का दिलं? जयंत पाटलांनी सांगितलं कारण

“आज आपल्या सर्वांच्या साक्षीने नितीन गडकरी यांच्या हस्ते राजाराम बापू इन्स्टिट्यूटचं नव्या हॉस्टेल इमारतीचं उद्घाटन झालं. 208 विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था करणाऱ्या व्यवस्थेचं आणि विद्यार्थ्यांसाठी जिमनॅशियम व्यवस्थेचं उद्घाटन करण्यासाठी आपण गडकरी यांना निमंत्रित केलं. त्यांनी या दोन्ही अत्यंत अत्याधुनिक असलेल्या व्यवस्थेचं उद्घाटन करुन ते व्यासपीठावर आले आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
अजित पवार यांना मित्रपक्षानेच सुनावलं, म्हणाले, ‘एकाच पक्षात दोन भूमिका घेऊन चालत नाही’
“महाराष्ट्रात आणि देशात रस्ते हा विषय जेव्हा निघतो तेव्हा गडकरी यांचं नाव लोक पहिल्यांदा घेतात. जे नवं आहे ते स्वीकारायचं, या देशात ध्यानीमनी कुणाच्या नाही अशा वस्तूंपासून ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न गडकरी करत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या इंजिनियरिंग कॉलेजला भेट द्यावी, त्यांनी इथल्या व्यवस्थेला पाहावं आणि उद्घाटन करावं म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना निमंत्रण दिलं. त्यांनी वेळेचा विलंब न करता आपलं निमंत्रण स्वीकारलं. त्यांनी आज बऱ्याचशा इन्स्टिट्यूच्या वतीने केलेले प्रेजेन्टेशन बघितलं. आमची संस्था ही देशातील पहिल्या 100 पैकी एक आहे”, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)