अल्पवयीन आरोपीला परिणामांची जाणीव, ब्लड रिपोर्ट काहीही आला तरी… – अमितेश कुमार

पुणे: पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला आता ५ जूनपर्यंत बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे तर त्याचे वडील विशाल अगरवाल यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्ररकरणी आतापर्यंत काय काय कारवाई करण्यात आली आहे आणि पुणे पोलिसांच्या कारवाईची दिशा काय हे स्पष्ट करण्यासाठी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अल्पवयीनवर प्रौढ म्हणून खटला चालवण्याची मागणी कोर्टात केली असल्याचं सांगितलं आहे. तसेच, त्याला कृत्याचे काय परिणाम होऊ शकतात हे त्याला माहिती होतं, असंही अमितेश कुमार यांनी सांगितलं.

पोलिस आयुक्तांनी काय काय सांगितलं?


पोर्शे कार अपघाताची घटना घडल्यावर प्राथमिक स्तरावर रविवारी (१९ मे) सकाळी ८ वाजता स्थानिक पोलिस ठाण्यात ३०४ (अ) चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी घटनाक्रम कळाल्यावर ३०४ कलम लावण्यात आला जो अजामीनपात्र होता. त्याचदिवशी बाल हक्क मंडळात आरोपीवर प्रौढ म्हणून खटला चालवाला ही मागणी करण्यात आली होती. त्याचा निर्णय येतपर्यंत त्याला बाल सुधार गृहात पाठवावे अशी मागणी केली होती. दोन्ही याचिका अमान्य झाल्या होत्या.

वडील आणि पबच्या मालकांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलं. ३०४ च्या प्रकरणात आम्ही याचिका केल्याप्रमाणे बाल हक्क मंडळाने त्याला ५ जूनपर्यंत बाल सुधार गृहात पाठवले आहे. प्रौढ म्हणून खटला चालवण्याच्या निर्णायावर प्रक्रिया सुरु आहे.

आम्ही सुरुवातीपासूनच हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने आणि बारकाव्याने तपासत आहोत. मजबूत केस तयार करत आहोत, पुरावे गोळा करत आहोत, कोणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला का याचाही तपास करत आहोत. दोन्ही प्रकरणांचा तपसा करत लवकरात लवकर पिडीतांना न्याय आणि आरोपींना शिक्षा होईल याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. दोन्ही प्रकरणात स्पेशल काऊंसिलची नियुक्ती करण्यात आली असून आमच्याकडून कोर्टात ठामपणे बाजू मांडण्यात येईल याचीही तयारी सुरु आहे.

पोलिसांनी सुरुवातीपासूनच कायद्यानुसार कारवाई केली आहे. पोलिसांवर दबाव होता किंवा तपासात दिरंगाई झाली हे म्हणणे बरोबर नाही. सुरुवातीच्या काळात ३०४ का नाही लावला, आरोपीला सुविधा पुरवण्यात आली यावर चौकशी केली. मात्र, यामध्ये कुठलेही तथ्य दिसून आले नाही. साक्षीदाराशी वाईट वागणूक झाली का याचीही तपासणी सुरु आहे, जर हे खरं ठरलं तर कठोर कारवाई केली जाईल. मी नागरिकांना आश्वासन देतो की यावर कठोरात कठोर कारवाई होईल

अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट अजून मिळालेली नाही. आणखी एक रक्ताचा नमुना फॉरेन्सिककडे पाठवण्यात आला आहे, त्यांच्याकडे आम्ही विनंती केली आहे की पहिला नमुना आणि दुसरा नमुना सारखा आहे की नाही याची तपासणी करावी, जेणेकरुन ते ब्लड नमुने अल्पवयीन आरोपीचेच आहेत की नाही हे तपासण्यासाठी डीएनए तपास करण्याचीही मागणी केली आहे. त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाही.

आम्ही जे कलम लावलं आहे ३०४ (अ) यामध्ये एक व्यक्ती पूर्णपणे दारुच्या नशेत, कुठलीही शुद्ध नसताना एक अपघात घडला, तर ही कलम जामीनपात्र असून त्यात तीन वर्षांच्या तुरुंगवास अशी शिक्षा असते. यामध्ये आम्ही ३०४ ही कलम लावली आहे. म्हणजे त्याला जाणीव होती की त्याच्या कृत्याने कोणाचा जीव जाऊ शकतो. अल्पवयीन असून महागडी गाडी चालवणे, एका पबमध्ये जाऊन दारु पिणे, दुसऱ्या पबमध्ये जाऊन दारु पिणे, त्यानंतर एका रुंद रस्त्यावर जिथे रहदारी होती, तिथे भरधाव वेगाने गाडी चालवणे. त्याला याची जाणीव होती की त्याच्या या कृत्याने जीवितास हाणी होऊ शकते, तसेच, तो दारु पित होता याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे. ब्लड रिपोर्ट काहीही आल तरी हे प्रकरण त्यावर अवलंबून नाही, याची दिशाच वेगळी आहे. आम्ही त्याच्यावर जे कलम लावलं आहे त्यामध्ये १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून तो अजामीनपात्र आहे.