Pune News : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! यंदापासून दहावी, बारावीच्या परीक्षेत ‘हा’ महत्वाचा बदल

प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा विभागून सत्रांमध्ये घेणे, राज्य मंडळाला सोयीचे ठरणार नसल्याने, मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक ताळेबंद करून, त्या दोनदा घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षाची (२०२४-२५) दहावी आणि बारावीची परीक्षा १५ ते २० दिवस लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा जूनमध्ये घेण्याचे संकेत राज्य मंडळाने दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्याला फेब्रुवारी आणि जून अशा दोन सत्रांमध्ये परीक्षेची संधी मिळणार आहे.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधला. शैक्षणिक धोरणात दहावी आणि बारावीची परीक्षा सत्रनिहाय घेण्याबाबत सुचविले आहे. यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सत्रनिहाय परीक्षा घेण्याची चाचपणी केली. मात्र, त्याऐवजी वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याबाबत त्यांनी नव्याने विचार सुरू केला आहे.

Pune News : वन्यप्राण्यांचे सततचे हल्ले, खेड तालुक्यात वन विभागाकडून १०८ शेतकऱ्यांना ११ लाखांची भरपाई

याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांतूनच समोर आले आहे. राज्य मंडळाकडून प्रचलित पद्धतीनुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोनदा (नियमित; तसेच पुरवणी) घेण्यात येतात. फेब्रुवारी-मार्च सत्रातील परीक्षेच्या निकालात कमी गुण मिळाल्या विद्यार्थ्यांना निकालातील श्रेणी सुधारण्याची संधी दिली जाते. त्याचप्रमाणे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनाही उत्तीर्ण होण्याची संधी मिळते.

या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाकडून आगामी फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू होणाऱ्या दोन्ही परीक्षा १५ ते २० दिवसांपूर्वी आयोजित करण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. असे झाल्यास, बारावीची परीक्षा वेळेत संपून निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, तर दहावीच्या परीक्षेचा निकाल मे मेहिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा (फेरपरीक्षा / पुरवणी परीक्षा) होतील. त्यानंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येईल. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दोन संधी मिळतील. त्यासाठी शिक्षण विभागाकडून धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.

राज्य मंडळाला सत्रनिहाय परीक्षा अडचणी?

दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुमारे ३२ लाख विद्यार्थी बसतात. ही संख्या खूप मोठी आहे. अशा वेळी परीक्षा विभागून सत्रनिहाय घेतल्यास, शिक्षक, कर्मचारी आणि राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांचा वेळ परीक्षेचे आयोजन करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंत जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया सत्रनिहाय करायची असल्यास, भरपूर वेळ जाणार आहे. याचा विपरित परिणाम शैक्षणिक अध्यापनावर होऊ शकतो, असेही शरद गोसावी सांगितले.

‘सीईटी सेल’ आणि ‘एनटीए’शी संवाद साधावा लागणार

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) जेईई परीक्षा दोन सत्रांत घेण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्याला दोनदा परीक्षेची संधी मिळते. सर्वाधिक गुण असलेल्या परीक्षेचे गुण पुढे ‘जेईई अॅडव्हान्स्ड’साठी ग्राह्य धरण्यात येतात. राज्य सामायिक परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) आणि ‘एनटीए’कडून पदवी अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षा साधारण फेब्रुवारी ते मे महिन्यांत घेण्यात येतात. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांशी संवाद साधून, दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे. त्यानंतर दोनदा परीक्षा शक्य असल्याचे अभ्यासकांनी सांगितले.