पुणे अपघात : आरोपीला निबंध लिहायची शिक्षा, राहुल गांधी यांचा संताप, ट्विट करून म्हणाले…

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचालक अल्पवयीन युवकाला बाल न्याय मंडळाने रविवारी जामीन मंजूर केला. या युवकाने येरवडा वाहतूक पोलिसांसोबत पंधरा दिवस वाहतूक नियमनाचे काम करावे, त्याने अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहावा, वाहतूक जागृती फलक रंगवावेत आणि व्यसनमुक्तीसाठी डॉक्टरांचे उपचार व मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घ्यावे, अशा अटी-शर्ती न्यायालयाने घातल्या आहेत. न्यायालयाच्या अटी शर्तींवर समाज माध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना तसेच पुणे पोलिसांच्या चौकशीवर विरोधी पक्षाकडून संशय व्यक्त केला जात असताना राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करून नाराजी व्यक्त केली आहे. ही न्यायाची लढाई असल्याचे सांगत गरीब आणि श्रीमंतांना सारखाच न्याय मिळायला हवा, त्यासाठीच माझी लढाई सुरू असल्याचे ते म्हणाले.

कल्याणीनगर अपघातानंतर येरवडा पोलिसांनी अल्पवयीन कारचालक युवकाला ताब्यात घेऊन, त्याच्यावर भारतीय दंड संहितेनुसार, बेदरकारपणे वाहन चालविणे, इतरांच्या जीवाला धोका पोहोचविणारी कृती करणे यांसह मोटार वाहन कायद्याखाली कलम लावण्यात आले. या प्रकरणातील विविध आरोपींवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल करून अटकेच्या कारवाया देखील केल्या आहेत. दरम्यान मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी धनाढ्य बापाच्या लेकाने दोन जीव घेऊनही त्याला मिळालेल्या जामीनावर अप्रत्यक्ष टीका केली.

राहुल गांधी काय म्हणाले?

ओला, उबर, ट्रक ड्रायव्हर यांच्याकडून जर चुकून अपघात झाला, यांच्या हातून जर कुणाचा मृत्यू झाला तर त्यांना १० वर्षांची शिक्षा होते, पण श्रीमंत बापाचा पोरगा दारू पिऊन पोर्श गाडी चालवून दोन लोकांची हत्या करतो तर त्याला निबंध लिहायला सांगितले जाते. ओला, उबर, ट्रक ड्रायव्हर यांच्याकडून निबंध लिहून का घेतला जात नाही? एका मुलाखतीत नरेंद्र मोदी यांना विचारलं गेलं, इथे दोन भारत निर्माण होतायेत- एक गरिबांचा भारत आणि दुसरा श्रीमंतांचा भारत, त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले, मग मी काय सगळ्यांना गरीब बनवू? इथे प्रश्न न्यायाचा आहे. गरीब आणि श्रीमंतांनाही न्याय मिळायला हवा. न्याय सगळ्यांना सारखा हवा, त्यासाठीच तर आम्ही अन्यायाविरोधात लढतो आहोत.
बालहक्क मंडळाच्या भूमिकेने पोलिसांना धक्का, आरोपीसहित वडिलांवर गुन्हा, ज्यांनी दारू दिली त्यांनाही अटक केली : फडणवीस

बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात आम्ही वरील कोर्टात दाद मागणार : फडणवीस

बालहक्क मंडळाच्या भूमिकेने खरेतर पोलिसांना जबर धक्का बसला. आरोपीला घटनेच्या २४ तासांच्या आतच जामीन दिल्यानंतर लोकांमध्ये संताप आणि नाराजी आहे. आरोपीची सहज सुटका होणे हे सहन केले जाणार नाही, असे सांगून बालहक्क मंडळाच्या आदेशाविरोधात आम्ही वरील कोर्टात दाद मागणार असल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.