मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! लवकरच होऊ शकते पाणीकपात, धरणांत एवढाच पाणीसाठा शिल्लक

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सर्वाधिक साठवणक्षमता असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. भातसामध्ये अवघे आठ टक्के, तर अप्पर वैतरणात चार टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत रविवारपर्यंत ११ टक्केच पाणीसाठा असून, वरूणराजाची कृपा होईपर्यंत मुंबईकरांना पाणी काटकसरीनेच वापरावे लागणार असल्याची चिन्हे आहेत.

मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात तलावांतून मुंबईला पाणीपुरवठा होतो. या तलावांची पाणी साठवणक्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या तलावांतून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. वाढलेला उष्मा आणि पाण्याची मागणी आणि तलावांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवन यांमुळे तलावांतील पाण्याची पातळी घटली आहे.

भातसा आणि अप्पर वैतरणाची साठवणक्षमता जास्त आहे. भातसाची साठवणक्षमता ७ लाख १७ हजार ३७ दशलक्ष लिटर आहे. मात्र, या तलावात सध्या आठ टक्के म्हणजेच, ६१ हजार ४७० दशलक्ष लिटर साठाच आहे. अप्पर वैतरणाची २ लाख २७ हजार ४७ दशलक्ष लिटर साठवणक्षमता असून अवघा ९ हजार ७८० दशलक्ष लिटर म्हणजेच चार टक्के पाणीसाठा आहे. मोडक सागरमध्ये १९ टक्के, तानसामध्ये ३० टक्के, मध्य वैतरणात ११ टक्के, विहारमध्ये २५ टक्के आणि तुळशीमध्ये ३२ टक्के पाणीसाठा आहे. या तलावांत एकूण ११ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. २०२३ मध्ये यावेळी सातही तलावांत १७.७२ टक्के आणि २०२२ मध्ये २१.७६ टक्के पाणीसाठा होता. पाणीसाठा दहा टक्क्यांखाली गेल्यास मुंबई महापालिका दहा टक्के पाणीकपातीचा विचार करते.

लवकरच पाणीकपात?

मुंबईतील सात तलावांतील उपलब्ध पाणीसाठा आणि अतिरिक्त पाणीसाठ्याचा आढावा या आठवड्याच्या अखेरीस घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली. पाणीकपातीचा विचार झाल्यास ती दहा टक्क्यांपर्यंत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असला तरी मुंबईसाठी राज्य शासनाने यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली आहे. उपलब्ध पाणीसाठ्यावर महापालिकेचे बारीक लक्ष असून, ३१ जुलैपर्यंत पुरेल, असे पाणी नियोजन करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने ७ मे रोजी दिली होती.