उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे मुख्यमंत्री, ते आले आणि करोना आला, राणेंनी पुन्हा डिवचलं

मुंबई: उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री, हा आला आणि करोना आला, असं म्हणत भाजपचे लोकसभेचे उमेदवार नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ते शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मुंबई आले होते. यावेळी महायुतीच्या सभेत बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं.

नारायण राणे काय म्हणाले?

“जे मोदींवर बोलतात ते कोण आहेत त्यांची गुणवत्ता काय, पात्रता काय? आज मोदींच्या मागे ३०३ खासदार आहेत. या निवडणुकीनंतर ४०० पार होणार. यांच्याकडे काय आहे. जे आता बोलत आहेत त्यांच्याकडे काय आहे. लोकसभेत ५४१ खासदार आहेत त्यात यांचे मातोश्रीवाल्यांचे किती आहेत, तर ५, निवडणुकीनंतर दोन तीन आले तर आले. बोलतात कोणावर पंतप्रधानावर. बोलताना विचार करावा. महाराष्ट्राची संस्कृती आहे, मोठ्या माणसाबद्दल बोलत नाही, मग तो वयाने मोठा असो, गुणाने असो की कर्तृत्वाने असो. पण, यांना पात्रता माहित नाही. कोणत्याची गोष्टीचं निर्बंध पाळत नाही”, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना ऐकवलं.

“पंतप्रधानांबद्दल बोलताना जणाची नाही मनाची वाटत नाही. दहा वर्षात, अर्थव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था सुधारली. करोना आला, जगात अनेक देशांमध्ये लाखो लोक गेले. मोदी स्वस्थ बसले नाही. आपल्या देशात लस निर्माण केली. आपल्या देशातल्या लोकांचं लसीकरण केलं, परदेशात २२० कोटी लोकांना लसीकरण मोदींच्या कृपेमुळे झालं. प्राण वाचवले त्यांनी”, असं म्हणत राणेंनी मोदींचं कौतुक केलं.

“तेव्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होता, हा पांढऱ्या पायाचा उद्धव ठाकरे. तो आला आणि करोना घेऊन आला”, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.