Pune News :आई-वडिलांच्या नात्यातील कलह, ७ वर्षांपासून दुरावलेल्या नातवास मिळणार आजी-आजोबांचे प्रेम

प्रतिनिधी, पुणे : नवरा-बायकोच्या भांडणामुळे गेल्या सात वर्षांपासून नातवाचे तोंडही पाहू न शकलेले आजी-आजोबा आता न्यायालयाच्या आदेशाने १५ दिवस नातवासोबत राहू शकणार आहेत. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने २० मेपासून तीन जूनपर्यंत आईकडे असलेला मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश के. ए. बागे-पाटील यांनी दिले आहेत.राज आणि प्रिया (दोघांची नावे बदलली आहेत) यांचे अरेंज मॅरेज झाले. राज चालक असून, प्रिया द्विपदवीधर आहे. त्यांचा समीर नावाचा मुलगा सातव्या इयत्तेत शिकतो. राज आणि प्रियामध्ये भांडणे झाल्याने ते मागील सात वर्षांपासून वेगळे राहतात. समीरचा ताबा आईकडे आहे. सध्या त्याच्या शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे समीरचा एक महिन्याचा तात्पुरता ताबा देण्याच्या मागणीसाठी त्याच्या वडिलांनी ॲड. गायत्री कांबळे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता.

Children’s Health : चिंताजनक! लहान मुलांना उन्हाळी आजरांचा त्रास, ‘अशी’ घ्या मुलांची काळजी
‘मला मुलाला भेटण्याचा हक्क आहे; परंतु प्रिया हेतुपुरस्सर मुलाची भेट घेण्यापासून आपल्याला रोखत आहे. माझे आई-वडील २०१७पासून नातवाला भेटू शकलेले नाहीत. ते त्याला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे मुलाचा तात्पुरता ताबा देण्यात यावा,’ अशी मागणी राजने या अर्जात केली.

प्रियाने या मागणीला विरोध केला. ‘राजला मद्याचे व्यसन असून, त्याच्या अंमलाखाली त्याने मुलासमोर मला मारहाण केली आहे. त्यामुळे मुलाच्या मनात वडिलांविषयी प्रचंड दहशत असून, त्याच्या घरी मुलाची काळजी घेणारे कोणीही नाही. मीच मुलाची जबाबदारी घेतली असून, त्याचा ताबा अचानक नवऱ्याला देणे वेदनादायी आहे,’ असे प्रियाचे म्हणणे होते.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. ‘राज समीरचे वडील असून, त्यांना आपल्या मुलाला भेटण्याचा समान हक्क आहे,’ असे नमूद करून न्यायालयाने १५ दिवसांसाठी समीरचा ताबा वडिलांकडे दिला. ‘या कालावधीत राज आणि त्याचे कुटुंबीय समीरशी आईबद्दल किंवा न्यायालयात दाखल खटल्याबद्दल वाच्यता करणार नाहीत, आई मुलाशी टेलिफोन किंवा व्हिडिओ कॉलवर बोलू शकते; तसेच हा कालावधी संपल्यावर समीरचा ताबा पुन्हा आईकडे देण्यात यावा,’ अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्टीत ताब्यांचे दावे

दर वर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीत शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने मुलांचा ताबा मिळावा म्हणून कौटुंबिक न्यायालयात दावे दाखल होण्याचे प्रमाण वाढते. या दाव्यांची सुनावणी प्रामुख्याने घेतली जाते.

अपत्याला आई आणि वडील या दोघांचेही प्रेम आणि माया मिळणे आवश्यक असते. आजी-आजोबांनाही नातवाला पाहायचे असते. मात्र, पती-पत्नीच्या वादात त्यांची फरफट होते. मुलांवर आई-वडील दोघांचाही समान अधिकार असतो. तो अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे न्यायालयाने निकालातून अधोरेखित केले आहे.

– ॲड. गायत्री कांबळे, पतीच्या वकील