सावधान! सायबर फसवणुकीत प्रचंड वाढ, तुम्हीही होऊ शकता शिकार, ४ वर्षांत २३०० कोटींवर डल्ला

मुंबई : राज्यातील सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून, यातील आर्थिक फसवणुकीचे आकडे चिंता वाढविणारे आहेत. २०२१ ते २०२५ या चार वर्षांच्या कालावधीत राज्यात तब्बल दोन हजार तीनशे कोटींची फसवणूक झाली आहे. पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनमुळे सव्वा दोनशे कोटींपेक्षा अधिक रक्कम वाचवण्यात यश आले आहे. सायबर फसवणुकीची जास्तीत जास्त रक्कम वाचवण्यासाठी १९३० ही हेल्पलाइन अधिक अद्ययावत केली जात असल्याचे राज्य सायबर पोलिसांनी म्हटले आहे.मुंबई आणि महाराष्ट्रासह देशापुढे सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान आहे. राज्यातही वेगवेगळ्या गुन्हेपद्धती वापरून सर्वसामान्य नागरिकांची सायबर फसवणूक करण्याचे प्रमाण अधिक आहे. सायबर गुन्हेगारीत आर्थिक गुन्हेगारी सर्वाधिक असून चोरांना अटक करण्याबरोबरच फसवणुकीद्वारे लुटलेली रक्कम वाचवण्यास पोलिसांनी प्राधान्य दिले आहे. यासाठी २०२१पासून १९३० ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली. सुरुवातीला केवळ दिवस काही तास सुरू असणारी ही हेल्पलाइन आता २४ तास सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी, २०२१ ते मे २०२४ या चार वर्षांतील हेल्पलाइनच्या कारवाईचा लेखाजोखा दिला आहे. चार वर्षांतील सायबर गुन्ह्यातील आर्थिक फसवणुकीचे आकडे धक्कादायक आहेत. या चार वर्षांत सायबर फसवणुकीत सर्वसामान्य नागरिकांनी दोन हजार ३७९ कोटी रुपये गमावले आहे. हेल्पलाइनशी वेळेत संपर्क साधल्यामुळे यापैकी २२२ कोटी रुपये वाचविण्यात यश आले आहे. नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी जनजागृतीवर भर देण्याबरोबरच हेल्पलाइनच्या मदतीने नागरिकांचे पैसे वाचविण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सायबरचे उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांनी सांगितले.
भाजप देतंय ३ महिन्यांचा रिचार्ज मोफत? सावधान; सोशल मीडियावर ‘तो’ मेसेज व्हायरल, क्लिक कराल तर पस्तवाल
तक्रारींचे दिवसाला तीन हजार फोन

पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनसाठी एकूण २३ फोनलाइनचा वापर करण्यात येत असून, ११० अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी अविरत कार्यरत आहेत. वेगवेगळी सॉफ्टवेअर तसेच तंत्रज्ञान वापरून ही हेल्पलाइन अद्ययावत करण्यात येत आहे. तक्रारीसाठी दिवसाला सुमारे अडीच ते तीन हजार फोन येतात, असे सायबर पोलिसांनी सांगितले.