सावधान! पुढील पाच दिवस तुफानी, मुंबईत काही तासात धो-धो बरसणार, पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट

मुंबई: जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला आहे. जूनमध्ये पावसाने दडी मारल्यानंतर चिंता वाढली होती. जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने यावर्षी वरुणराजा रुसला की काय अशी परिस्थिती होती. पण, जुलै महिना सुरु होताच पावसाने राज्यात जोरदार एन्ट्री केली आणि सारेख सुखावले. जुलै महिन्याच्या १ तारखेपासूनच मान्सूनने राज्यात जोर धरला असून या महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊन जून महिन्याची कसर भरुन निघणार आहे. मान्सूनने अखेर राज्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यासह संपूर्ण राज्य मान्सूनने गेल्या काही दिवसात व्यापलं आहे. जुलै महिन्याच्या पहिले चार दिवस मुंबईसह राज्यात जोरदार पाऊस झाला. तर आता पुढील पाच दिवसही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईत काही तासात मुसळधार पाऊस कोसळणार

आजही मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. तर, येत्या काही तासात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागांना पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे, कोल्हापुरात अतिमुसळधार पाऊस

मुंबई-ठाणे, पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूरमध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, विदर्भातही पावसाची शक्यता आहे. येथील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भाग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसेल.

सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावासाच ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस (५ ते १० जुलै) हे पावसाचे असेल. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावासाच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, पालघरसह कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.