सावधान! पुढील तीन तास पावसाचे, मुंबई, रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार, वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: मुंबईसह उपनगराला रविवारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. सततच्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात तसेच रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला, तर पहाटेपासूनच लोकलची वाहतूक वस्कळीत आहे. मध्य आणि हार्बर मार्गावर लोकल वाहतूक ठप्प आहे. तर आता पुढील तीन तास मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचे असून हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुढील तीन तास राज्यात धो-धो

हवामान विभागाकडून मुंबई, रत्नागिरी, रायगड परिसरात पुढील तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर आणि सातारा, कोल्हापूर आणि नाशकातील घाट माथ्यावर मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून पावासाचा अलर्ट जारी करण्यात आला असून गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Mumbai Rains: पुढील काही तास महत्त्वाचे, मुंबईत जोरदार पाऊस, समुद्राला मोठी भरती, महालक्ष्मी एक्स्प्रेस रखडली

मुंबईसह उपनगर आणि कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट

राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून १० जुलैपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईसह कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आह. पुढील पाच दिवस मुंबईसह उपनगर आणि कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. येत्या पाच दिवसात कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे.

विदर्भात मान्सून पोहोचला पण त्याने संपूर्ण विदर्भ व्यापायला वेळ घेतला. आता विदर्भाताली बहुतांश भागात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला. असाच पाऊस पुढील पाच दिवस सुरु राहणार आहे.

पुणे, कोल्हापूर, साताऱ्यालाही धुव्वाधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातही बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईतील लोकलसेवा विस्कळीत

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचलं आहे, तर रेल्वे रुळही पाण्याखाली गेल्याने लोकल सेवा ठप्प पडली आहे. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नोकरीवर जाण्यासाठी लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी केली होती.