सांगलीत भाजपमध्ये बंड, संजयकाका पाटलांचा प्रचार करण्यास नकार, माजी आमदारांचा राजीनामा

सांगली: भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात उघड उघड बंड करत खासदार संजय काका पाटील यांचा प्रचार करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे पाठवून दिला. मात्र त्यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झाला नसल्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
जनता मोदींना सांगते आम्हाला भूक लागली, मोदी म्हणतात, गप्प बसा नाही तर मुसलमान येतील, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
लोकसभा निवडणुकीत लोकसभेचा उमेदवार बदला, अशी आग्रही मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली होती. मात्र पक्षाने पुन्हा संजय काका पाटील यांच्या पारड्यात वजन टाकत त्यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे माजी आमदार विलास जगताप हे कमालीचे नाराज झाले. विधानसभा निवडणुकीत खासदार संजय काका पाटील यांनी माझ्याशी गद्दारी केली आहे, असा त्यांनी आरोप केला होता. पक्षाने उमेदवार न बदलल्यामुळे माजी आमदार विलासराव जगताप यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा यांना पाठिंबा दिला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील हेच निवडून येणार कोणीही पैज लावा, असे जाहीर आव्हान त्यांनी केले.भाजपचे तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत आणि युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप यांची हकालपट्टी करण्यात आली. मात्र माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपच्या सदस्याचा राजीनामा दिला होता. मात्र पक्षाने अद्यापही मंजूर न केल्यामुळे एकंदरीत उलटसुलट चर्चेला उधाण आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांनी माझ्या निवडणुकीचा बेरंग करणाऱ्या जगताप यांचा येणाऱ्या काळात बेरंग करू. जगताप यांना अनेक वेळा मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी बंडखोर विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा राहत पक्षाची गद्दारी केली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी वरिष्ठांकडे मागणी देखील केली आहे, असे संजय काका पाटील म्हणाले होते.

भाजपमधील अनेक नेत्यांनी संजय काका पाटील यांना विरोध केला होता. भाजपचे सांगली जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची ऑडिओ क्लिप निवडणुकीच्या दरम्यान व्हायरल झाली होती. त्यामध्ये ते संजयकाकांना मतदान करायचं नाही, आपल्याला विशाल पाटील यांनाच मतदान करायचा आहे. अशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संजयकाका यांनी वरिष्ठांना कळवत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे.