सव्वालाख विद्यार्थी शाळाबाह्य? यू-डायस प्रणालीमधील धक्कादायक नोंद, शिक्षण विभाग म्हणतो…

रोहन टिल्लू, मुंबई : एकीकडे राज्यातील शेवटच्या मुलापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी राज्य सरकारची धडपड सुरू असताना, दुसऱ्या बाजूला राज्यभरातील तब्बल एक लाख १९ हजार विद्यार्थी गेल्या वर्षभरात ‘शाळाबाह्य’ म्हणून नोंदवले गेल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या यू-डायस प्लस प्रणालीमध्ये नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षात राज्यातील एक हजार ५४२ शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक लाख १८ हजार ९९७ विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड नोंदणीतील तफावतीमुळे हा गोंधळ झाल्याचे स्पष्टीकरण शालेय शिक्षण विभागाने दिले आहे.केंद्र सरकारच्या यू-डायस प्लस प्रणालीमध्ये २०२४-२५ या वर्षातील राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळांची व राज्यभरातील विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही शाळास्तरावर सुरू आहे. हे करत असताना त्यात चुकीची नोंदणी, मृत्यू, शाळाबाह्य विद्यार्थी, बारावीत उत्तीर्ण विद्यार्थी अशा रकान्यांमध्ये नोंद केली जाते. त्या तक्त्यात केलेल्या नोंदीनुसार, राज्यभरातून एक लाख १८ हजार ९९७ विद्यार्थी शालाबाह्य किंवा शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडले आहेत.

शालाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत पुणे जिल्हा अग्रक्रमावर आहे. पुण्यातील १९ हजार ३६३ विद्यार्थी शाळेच्या पटावरून कमी झाले आहेत. त्या खालोखाल मुंबई उपनगर (१३ हजार ९४४) आणि ठाणे (नऊ हजार ५३२) या जिल्ह्यांमधून ‘शाळाबाह्य’ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक म्हणजे २४५ विद्यार्थ्यांचा मृत्यू गेल्या शैक्षणिक वर्षात झाला.

याबाबत राज्य प्रकल्प समन्वयक व संचालक समीर सावंत यांच्याकडे विचारणा केली असता, अद्याप याद्या पडताळणीचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शाळा शिक्षक हे स्वतंत्रपणे पडताळणी करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आधार नोंदणीतील तफावत कारणीभूत

दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सुरू आहे. नावात बदल असेल किंवा जन्मतारीख जुळत नसेल, तर आधार कार्डाची पडताळणी होत नाही. अशी मुले शाळाबाह्य मुलांच्या यादीत येतात. पूर्वी मुख्याध्यापकांच्या सहीनिशी विद्यार्थ्यांची आधार कार्ड नोंदणी होत होती. आता विद्यार्थ्यांच्या पालकांपैकी एकाचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पालघरसारख्या दुर्गम जिल्ह्यांमध्ये अनेकांकडे आधार कार्ड नसल्याने अनेक विद्यार्थ्यांची नावे शाळाबाह्य मुलांच्या यादीत आहेत, असे प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प समन्वयक व संचालक समीर सावंत यांनी सांगितले.
Maharashtra CAG Report: तिजोरीवर वाढता ताण; राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत ‘कॅग’च्या अहवालात चिंता व्यक्त
राज्यातील सव्वा लाख विद्यार्थी शाळाबाह्य असतील, तर राज्याची त्यांच्याबाबत काय योजना आहे, याचे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे. शाळाबाह्य मुलांच्या संख्येला आळा घालण्यासाठी आणि पटसंख्या वाढवण्यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना करायला हव्या.– संतोष शिंदे, बालविकास कार्यकर्ते, विधायक भारती

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकी शिक्षणात रस नसेल आणि त्यामुळे विद्यार्थी शाळेपासून दूर जात असतील, तर कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत या विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जाईल. त्याबाबत शिक्षक गावोगावी जाऊन माहिती करून घेत आहेत. कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना लिहिण्या-वाचण्याचे धडेही दिले जाणार आहेत.– दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री