सकाळी नऊपूर्वी भरणाऱ्या शाळांना छडी; शिक्षण विभागाची करडी नजर, परवानगी न घेतल्यास थेट ‘कारणे दाखवा’

मुंबई : बदलत्या जीवनशैलीनुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ सकाळी ७ ऐवजी ९ किंवा त्यानंतर करावी, असे परिपत्रक सरकारने काढूनही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राज्यातील बहुतेक शाळा अजूनही सकाळी ७ वाजताच भरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षण विभागाने कठोर पाऊल उचलले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीविना सकाळी ९ वाजण्याआधी शाळा भरत असतील, तर अशा शाळांना आता ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे.

राज्यपाल रमेश बैस यांनी एका जाहीर कार्यक्रमात शाळांच्या वेळा बदलण्याबाबत वक्तव्य केले होते. याची दखल घेत, राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने ८ फेब्रुवारी रोजी परिपत्रक काढत, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आपल्या वेळेत बदल करण्याची सूचना शाळांना केली होती. या सूचनेचे पालन होते आहे का, हे पाहण्याची जबाबदारी शिक्षण संचालकांवर सोपवली होती. या निर्णयाबाबत काही हरकती किंवा अडचणी असतील, तर शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून परवानगी घेणे अपेक्षित होते.

आता शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही काही शाळांनी पालकांशी चर्चा करून आपल्या वेळेत बदल केला आहे. मात्र अजूनही बऱ्याच शाळांनी या परिपत्रकाची अंमलबजावणी केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. ज्या शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र लिहून सबळ कारण न देता सकाळी नऊच्या आधी शाळा भरवल्या असतील, त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याबाबतचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
Chhatrapati Sambhajinagar: जिल्ह्यातील प्राथमिक शाळा भरणार नऊनंतर; शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या सूचना
सर्वच शाळांना वेळबदल अशक्य

याबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याशी संपर्क साधला असता, सरसकट सगळ्याच शाळा सकाळी ९ नंतर भरवणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक शाळांच्या वेळा बदलणे शक्य नाही. लहान मुलांचे वर्ग तळमजला किंवा पहिल्या मजल्यावर भरतात. बहुतांश सर्वच शाळा सकाळी आणि दुपारी अशा दोन पाळ्यांमध्ये भरत असल्याने खास पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करणेही अनेक शाळांना शक्य नाही. तरीही ज्या शाळांना हे बदल करणे शक्य आहे, त्यांनी ते केले आहेत, असे मांढरे यांनी सांगितले.

बसचे नियोजन कठीण

पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांची वेळ सकाळी ९ नंतर केल्यास बसगाड्यांचे नियोजन करणे कठीण जाईल. बसचालकांना तीन-तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागेल. तसेच रस्त्यावरील वाहतुकीवरही त्याचा विपरित परिणाम होईल. त्यामुळे हा निर्णय शाळा, लहान मुले आणि त्यांचे पालक यांच्याही सोयीचा नाही, अशी भूमिका स्कूलबस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी मांडली आहे.