शिंदेंचं गणित सेट, दादांना दगाफटक्याची भीती; परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस केंद्रस्थानी

मुंबई: राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार असताना झालेल्या राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना फटका बसला. संख्याबळ नसतानाही भाजपनं अधिकचे उमेदवार दोन्ही निवडणुकीत विजयी केले. जून २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे विजयी झाले. त्यानंतर पुढच्या काही आठवड्यांमध्ये ठाकरे सरकार कोसळलं. आता पुन्हा एकदा विधान परिषदेची निवडणूक होत आहे आणि काँग्रेसची मतं कोणाला जाणार याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.

विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी २३ मतं गरजेची आहेत. विधानसभेत काँग्रेसचे ३७ आमदार आहेत. त्यामुळे पक्षाकडे १४ अतिरिक्त मतं आहेत. त्यामुळे काँग्रेसला महत्त्व प्राप्त झालं आहे. काँग्रेसची अतिरिक्त मतं आपल्याकडे वळवण्यासाठी बाकीच्या पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून उद्या मतदान होईल. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत आमदारांना मतदान करता येईल.
‘मोठा भाऊ’ भाजपचा विधानसभेसाठी मोठा दावा; शिंदे, दादांना किती जागा सोडण्याची तयारी?
काँग्रेसनं प्रज्ञा राजीव सातव यांना परिषदेची उमेदवारी दिली आहे. निवडून येण्यासाठी २३ मतांची गरज आहे. काँग्रेसकडे ३७ मतं आहेत. दगाफटका, जोखीम टाळण्यासाठी सातव यांच्यासाठी २७ मतं ठेवली जाऊ शकतात. तरीही काँग्रेसकडे १० मतं शिल्लक राहतात. आता ही मतं महाविकास आघाडीतील अन्य दोन उमेदवारांना जाणार की फुटणार ते पाहणं महत्त्वाचं असेल. २०२२ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली होती. त्यामुळे चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते. विशेष म्हणजे ते काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. दुसऱ्या पसंतीचे उमेदवार असलेले भाई जगताप मात्र विजयी झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परिषदेसाठी माजी खासदार भावना गवळी, कृपाल तुमानेंना संधी दिली आहे. त्यांच्यासाठी शिंदेंनी मतांची तजवीज केलेली आहे. अजित पवार गटासोबत दगाफटका होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटाच्या अनेक आमदारांनी परतीचे दोर लावण्यास सुरुवात केली आहे. या आमदारांपैकी काहींची मतं शरद पवार खेचू शकतात. महायुतीमधील तिन्ही पक्षांची एकत्रित रणनीती अद्याप ठरलेली नसल्यानं धोका कायम आहे.