वेटिंग लिस्टमधील तिकिटांवर आता प्रवास बंद, आरक्षित डब्यांतील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचं मोठं पाऊल

मुंबई : मुंबईहून ये-जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांतून प्रतीक्षायादीतील कन्फर्म नसलेल्या तिकिटांवर रेल्वे प्रवाशांना आता प्रवास करता येणार नाही. आरक्षित डब्यातील गर्दीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मध्य रेल्वेने कठोर पावले टाकली आहेत. आरक्षित डब्यातील गर्दी कमी करण्यासाठी विनातिकीट आणि प्रतीक्षायादीतील प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करून प्रवासादरम्यान कोणत्याही स्थानकांवर उतरवण्याची कारवाई सुरू केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीत होत आहे. गर्दीमुळे तिकीटधारक प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमध्ये प्रवेश करता येत नाही. डब्यात प्रवेश केल्यानंतर आरक्षित आसनापर्यंत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. व्हायरल व्हिडीओची गंभीर दखल रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे योग्य तिकीट नसलेल्या प्रवाशांना प्रवासादरम्यानच स्थानकांवर उतरवण्यात येत आहे.

‘गाडी क्रमांक ११०५९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते छपरा एक्स्प्रेसमधून सर्वाधिक २८२ प्रवाशांना स्थानकांवर उतरवण्यात आले.(११०६१) जयानगर एक्स्प्रेसमधून २०० प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ३१ मेल-एक्स्प्रेसची तपासणी केल्यानंतर सुमारे १,६०० प्रवाशांना विविध स्थानकात उतरवण्यात आले आहे’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनावेळी ‘मिशन रफ्तार’; मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ताशी १६० किमी वेगाने धावणार
ऑनलाअन प्रतीक्षायादीतील तिकीट कन्फर्म झाले नाही तर ते रद्द होऊन त्याचा परतावा प्रवाशांच्या थेट बँक खात्यात जमा होतो. तिकीट खिडकीवरील कन्फर्म नसलेले तिकीट प्रवाशांना रद्द करावे लागणार आहे. रेल्वेगाडीचा चार्ट साधारण चारतास आधी तयार होतो. त्याचवेळी तिकीट कन्फर्म झाले की नाही, याची माहिती प्रवाशांना समजते. गाडी सुटण्याच्या अर्धा तास आधी प्रतीक्षायादीतील तिकीट प्रवाशांनी रद्द केल्यास त्याचा पूर्ण परतावा प्रवाशांना मिळणार आहे. गाडी गेल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना कोणताही परतावा मिळणार नाही.

…तर प्रवास करता येणार

शयनयान श्रेणीच्या प्रतीक्षायादीच्या तिकीटावरून सामान्य श्रेणीतून प्रवास करण्याची मुभा आहे. गाडीतील वातानुकूलित डब्यात आसन रिक्त असल्यास तिकीटांतील फरक भरून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे, असे ही रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.