विधान परिषदेच्या निवडणुकीत दादांची कसोटी; सीक्रेट बॅलेटमुळे गेम होण्याची भीती; काय घडतंय?

मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी १२ जुलैला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार झाली. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळवता आल्या. यानंतर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत काय करणार याकडे लक्ष लागलं आहे. विधानसभेत सध्या २७४ आमदार आहेत. आमदारांचं निलंबन, काही आमदार लोकसभेवर गेल्यानं १४ जागा रिक्त आहेत.

विधान परिषदेचे ११ सदस्य २७ जुलैला निवृत्त होत आहेत. यातील ४ भाजपचे, २ काँग्रेसचे आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, शेकाप आणि रासपचा प्रत्येकी एक आमदार आहे. लोकसभेच्या निकालानंतर महायुतीत सुंदोपसुंदी सुरु आहे. भाजप आणि शिंदेसेनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात नाराजी आहे. राष्ट्रवादीला ४ पैकी केवळ १ जागा जिंकता आली आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांचं काम केलं नसल्याचा शिंदेसेना आणि भाजपमधील नेत्यांचा दावा आहे.
सत्ता टिकवायची असेल तर सर्जरीच करावी लागेल; संघाचा भाजपला सल्ला, बैठकीत काय काय चर्चा?
लोकसभेच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. पावसाळी अधिवेशाननंतर दादा गटाचे १८-१९ आमदार घरवापसी करणार असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत गुप्त मतदान असतं. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार क्रॉस व्होटिंग करु शकतात. तसं झाल्यास अजित पवारांवर नामुष्की ओढावू शकते.
Chhagan Bhujbal: बड्या नेत्यासोबत बैठक, दोन जागांचा आग्रह; भुजबळ घरवापसीच्या तयारीत, अजितदादांची साथ सोडणार?
गेल्या काही दिवसांपासून भाजपनं अजित पवारांपासून अंतर राखण्यास सुरुवात केली आहे. संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्ननायझरनं लोकसभेतील पराभवाला अजित पवारांना जबाबदार धरलं. भाजप-राष्ट्रवादी युतीची काय गरज होती, असा सवाल ऑर्गनायझरमधून उपस्थित करण्यात आला. अजित पवारांमुळे भाजपचा ब्रँड डॅमेज झाल्याची टीका करण्यात आली. विशेष म्हणजे भाजपच्या एकाही बड्या नेत्यानं याचा प्रतिवाद केला नाही.
Chhagan Bhujbal: भुजबळांची ‘समता’ खेळी, नेमकी कोणावर कुरघोडी? मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जुन्या पक्षात परतणार?
अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी गेल्याच आठवड्यात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी विधिमंडळात त्यांच्यासोबत केवळ राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. भाजप, शिंदेसेनेतला एकही नेता त्यावेळी हजर नव्हता. त्यामुळे भाजपसह शिंदेसेनेनं दादांपासून अंतर राखण्यास सुरु केल्याची चर्चा आहे. आता विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांचे आमदार काय करतात याकडे लक्ष लागलं आहे.

२०२२ मध्ये राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधारी महाविकास आघाडीतील नाराजी, बेबनाव लक्षात घेऊन राज्यसभा, विधानपरिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्के दिले. त्यांनी संख्याबळ नसतानाही दोन्ही निवडणुकीत भाजपचे अतिरिक्त उमेदवार निवडून आणले. त्यानंतर पुढच्या काहीच दिवसांत एकनाथ शिंदेंचं बंड झालं. पुढे राज्यात सत्तांघर घडलं. या सगळ्यासाठी फडणवीसांनी राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकीचा वापर खुबीनं केला होता.