विधान परिषदेची एक जागा पुण्याला हवीच, अजित पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी

पुणे : राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. १२ जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे आता ११ जागांवर कोणाला संधी दिली जाते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच आता राष्ट्रवादीने ( अजित पवार गट ) या ११ मध्ये पुण्याला संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सातव (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे. यातील पुण्यासाठी एक जागा घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहरातील शिष्टमंडळाने अजित पवार यांची भेट घेत केली आहे.

पुण्यातील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुंबईत थेट अजित पवार यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. विधानसभा निवडणुक चार महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यासाठी परिषदेची एक जागा हवीच आणि ती पुण्याला मिळावी, असा युक्तिवाद पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या २१ जागांपैकी ९ जागा अजित पवार गटाकडे आहेत. मात्र, जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असताना देखील लोकसभा निवडणुकीत पक्षाला समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. अजित पवार यांचे होम पीच असणाऱ्या बारामतीसह शिरूरमध्ये देखील पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वतःचे आमदार असताना देखील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना येथून मताधिक्य मिळाले.

तर, पुणे शहरातील हडपसर व वडगाव शेरी या दोन जागांवर मागील निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसऱ्या क्रमाकांवर असल्याने जागा वाटपात कदाचित अडचणीत येऊ शकतात, त्यामुळे राजकीयदृष्ट्या विधान परिषदेत पुण्यातून एक आमदार असणे गरजेचे आहे. विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा होत असताना त्याचा फायदा होण्याचा दावा शहर पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. आता यावर अजित पवार काय निर्णय घेतात याकडे राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याचे लक्ष लागले

महाराष्ट्रातील 11 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम कसा असेल

  • अधिसूचना – २५ जून २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जुलै २०२४
  • अर्जाची छाननी – ३ जुलै २०२४
  • अर्ज मागे घेण्याची तारीख – ५ जुलै २०२४
  • मतदानाची तारीख – १२ जुलै २०२४ (सकाळी ९ ते संध्याकाळी ४)
  • मतमोजणी आणि निकाल – १२ जुलै २०२४ (संध्याकाळी ५ वाजता)