विधानसभेला ८०-९० जागांचा भाजपचा शब्द, हक्काचा वाटा हवा, पुन्हा खटपट नको, भुजबळांची दादांना आठवण

मुंबई : सत्तेत सहभागी होताना भारतीय जनता पक्षाने विधानसभेला ८० ते ९० जागा लढवू देण्याचा शब्द दिला होता, तो पाळला जावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या विचारमंथन बैठकीत भुजबळ बोलत होते. भाजपकडून विधानसभा निवडणुकीत ८० ते ९० जागांचा शब्द देण्यात आला आहे. आपल्या हक्काचा वाटा आपल्याला मिळायलाच हवा. विधानसभेला लोकसभेसारखी खटपट व्हायला नको, अशी मागणी छगन भुजबळांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. लोकसभेला झालेल्या रस्सीखेचाची पुनरावृत्ती होऊ नये, असं भुजबळांचं म्हणणं आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होण्याआधीच भुजबळांनी भाजपला दिलेल्या शब्दास जागण्याचा अप्रत्यक्ष इशारा दिल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत नाशिकच्या जागेवरुन महायुतीत तणातणी पाहायला मिळाली. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यात जोरदार रस्सीखेच झाली. भाजपश्रेष्ठींनी आपल्याला नाशिकमधून लढण्यास सांगितलं होतं, मात्र उमेदवारी जाहीर होण्यात झालेली दिरंगाई पाहून माघार घेत आहे, असं भुजबळांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं होतं. हा अनुभव लक्षात घेत त्यांनी विधानसभेसाठी आधीच सावध पावलं टाकली आहेत.

छगन भुजबळ काय म्हणाले?

योग्य जो वाटा आहे, तो आपल्याला महाविकास… (चुकून) महायुतीमध्ये आपल्याला मिळायला पाहिजे. आपण आलो, त्यावेळीही त्यांनी आपल्याला सांगितलं ८०-९० जागा मिळतील, या वेळेला (लोकसभा) जी काय खटपट झाली, ती पाहता पुढे ही खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत, हे आधीच आपल्याला त्यांना सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर ५०-६० निवडून येणार हो. ५० च घ्यायच्या… मग त्यातल्या काही गळाल्या की आम्ही आणखी खाली येणार. तसं होताच कामा नये, त्यामुळे आताच त्यांना सांगून टाकावं, आमचा वाटा आम्हाला मिळायला हवा, असं छगन भुजबळ म्हणाले.
Vidhan Parishad Election : मतदारसंघ भाजप, उमेदवार मनसेचा, दावा शिंदेंच्या शिवसेनेचा; कोकण पदवीधरसाठी माजी महापौर उत्सुक
विधानसभेच्या २८८ जागांपैकी ८८ जागा राष्ट्रवादीला सोडल्यास, भाजपसह इतरांकडे जेमतेम २०० जागा उरतात. भाजपचे स्वतःचेच १०५ आमदार आहेत. भाजप विधानसभेला निम्म्याहून अधिक म्हणजे किमान १५० जागा लढवण्याची चर्चा गेल्या काही काळात होती. सध्या ४० च्या आसपास आमदार सोबत असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादीला जर दुप्पच जागा द्यायचं झालं, तर मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही तितक्याच किंवा त्याहून अधिक जागा सोडाव्या लागू शकतात.
Sonia Doohan : पवारांच्या ‘लेडी जेम्स बाँड’चा धक्का, अजितदादांना ‘अंत जल्द आयेगा’ म्हणणाऱ्या सोनिया दुहान ‘घड्याळ’ बांधणार?Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

याशिवाय इतर लहान मोठे मित्रपक्ष, अपक्ष आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही महायुतीत ‘आतून’ सहभागी झाली, तर त्यांनाही यथोचित जागा सोडताना तणातणीच अधिक होण्याची शक्यता आहे.