विधानसभेपूर्वी भाजप आमदारांचा आकडा वाढवण्याच्या तयारीत; ‘त्या’ १२ जागांचा प्रश्न मार्गी?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या महायुतीनं विधानसभेची तयारी सुरु केली आहे. राज्यातील सरकार कायम राखण्यासाठी भाजपनं विविध पातळ्यांवर काम सुरु केलं आहे. एका बाजूला विधान परिषदेची निवडणूक सुरु असताना भाजपनं राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्तीकडे लक्ष वळवलं आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यापासून हा विषय प्रलंबित आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी १२ आमदारांच्या नियुक्तीचं घोंगडं भिजत ठेवल्याची टीका महाविकास आघाडीकडून झाली होती. आता हा विषय मार्गी लावण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरु केले आहेत.

राज्यपालनियुक्त १२ आमदारांचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. येत्या ४ जुलैला याबद्दलचा महत्त्वाचा निर्णय होऊन राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी भाजपनं हालचाली सुरु केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीआधी १२ आमदारांची नियुक्ती होईल. त्यात भाजपचे ६, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी ३ आमदार असतील.
Harsimrat Kaur: महाराष्ट्रात जे केलं, तेच आमच्यासोबत…; शिवसेनेनंतर आणखी एका मित्रपक्षाचे BJPवर गंभीर आरोप
येत्या १२ जुलैला विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात भाजप सर्वाधिक ५ जागा लढवत आहे, तर शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी २ जागा लढवत आहे. उरलेल्या दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येऊ शकतात. यासोबतच राज्यपालनियुक्त आमदारांच्या निवडीसाठीही भाजपनं हालचाली सुरु केल्या आहेत. ४ जुलैला न्यायालयाकडून आमदारांच्या नियुक्तीला ग्रीन सिग्नल मिळेल याबद्दल भाजप आशावादी आहे. बारापैकी निम्म्या जागांवर भाजप आपल्या नेत्यांची वर्णी लावेल.

विधानसभा निवडणुकीला अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यापूर्वी विधान परिषदेतील अधिकाधिक जागा भरण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. २१ जूनला विधान परिषदेच्या ५ जागा रिक्त झाल्या. त्या आमदारांचा निरोप समारंभ आज संपन्न होईल. यात सेनेचे २ आणि भाजपचे ३ आमदार आहेत. २७ जुलैला आणखी ११ आमदारांचा कार्यकाळ संपेल.