विदर्भ-मराठवाड्यात पावसाची प्रतीक्षा संपणार? शिवसेनेचे किशोर दराडे विजयी सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. जूनने केला हिरमोड, आता जुलैकडून आशा

देशभरात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यानंतर आता जुलै महिन्यावर आशा केंद्रित झाल्या आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जुलैमध्ये देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकेल. दीर्घकालीन सरासरीपेक्षा १०६ टक्क्यांपेक्षा हा पाऊस अधिक असू शकेल. ईशान्य भारत, वायव्य भारताचा काही भाग; तसेच पूर्व भारत आणि दक्षिण भारताचा काही भाग येथे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस असेल अशी शक्यता आहे.

२. शिवसेनेचे किशोर दराडे विजयी

नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे विजयी झाले आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी २४ तास सुरू होती. मतमोजणीच्या रात्री उशिरापर्यंत तिसऱ्या फेरीअखेर दराडेंनी विजयी आघाडी घेतली होती. अखेर मंगळवारी सकाळी निकाल जाहीर झाला असून किशोर दराडे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. मी शिक्षकांची कामे केलेली होती, त्यामुळे माझ्यासमोर कोणाचंही आव्हान मला वाटत नव्हतं, त्यामुळे माझा विजय झालेला आहे आणि विजयाचं श्रेय शिक्षकांना देतो अशी प्रतिक्रिया किशोर दराडे यांनी दिलेली आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…

३. जुन्या पेन्शनसंदर्भात तीन महिन्यांत निर्णय

‘राज्यातील निमशासकीय व अनुदानित संस्थांमध्ये काम करणारे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी निघालेल्या जाहिरातीनुसार त्यानंतरच्या कालावधीत सेवेत रूजू झाले असल्यास, त्यांनाही जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्यांच्या आत घेण्यात येईल,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अधिक बातमी वाचा सविस्तर…

४. ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं संसदीय राजकारणात पाऊल

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. मिलिंद नार्वेकर आज, मंगळवारी दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याने उमेदवारी अर्ज सादर करण्याची अखेरच्या दिवशी कोण अर्ज भरतात, याकडे लक्ष आहे. उद्धव ठाकरे यांचे राईट हँड मानले जाणारे मिलिंद नार्वेकर आता विधिमंडळात आपला आवाज घुमवताना दिसणार आहेत.

५. मुंबईकरांना दिलासा; बर्फीवाला पुलाला हिरवा कंदील

अंधेरी पूर्व आणि पश्चिम प्रवासासाठी सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशत: उचलून तो गोपाळकृष्ण गोखले उड्डाणपुलाला समांतर उंचीवर जोडण्याचे आव्हानात्मक काम मुंबई महापालिकेने पूर्ण केले आहे. बर्फीवाला पुलावरील सर्व चाचण्या पूर्ण केल्यानंतर ‘व्हीजेटीआय’ने महापालिकेला या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे येत्या गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून बर्फीवाला पुलावरून जुहूच्या दिशेने अंधेरी गोखले पूल असा पश्चिम-पूर्व प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी सुरू केली जाणार आहे. अधिक बातमी वाचा सविस्तर…

६. भुशी डॅम दुर्घटना, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

पुणे जिल्ह्यातील संभाव्य आपत्तीप्रवण क्षेत्र, डोंगरकडे, धबधब्यांसह प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येणार नाही, अशी पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करावीत;तसेच सायंकाळी सहानंतर अभयारण्यांमध्ये पर्यटकांना प्रवेश देऊ नये, असा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सोमवारी दिला.

७. भीमाशंकर येथील धबधबे पर्यटकांसाठी बंद

भीमाशंकर देवस्थान दर्शन आणि वर्षा पर्यटनासाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना अपघात प्रवण क्षेत्रात येत्या ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी वर्षासहलींसाठी या भागात येऊ नये, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेश वन विभागाने (वन्यजीव) प्रसिद्धीपत्रकाद्वारे काढले आहेत.

८. विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी आता पुन्हा एकदा मुंबईकर सज्ज

टी-२० वर्ल्ड कप २०२४ वर भारताने आपले नाव कोरल्यानंतर आता टीम इंडिया भारतात कधी परतते आहे याची वाट पूर्ण देश पाहत आहे. तब्बल १७ वर्षांचा दुष्काळ संपवून भारताने अखेर ट्रॉफीवर आपला हक्क सांगितलाच. तर टीम इंडिया भारतात आल्यावर त्यांचे एअरपोर्टवर तर जंगी स्वागत होणारच आहे पण २००७साली जशी रॅली काढण्यात आली होती तशी यावेळी पण निघणार का याची उत्सुकता आता चाहत्यांना लागून आहे.

९. TISS मधील नोकरकपात नाट्यावर पडदा

देशातील सर्वाधिक सन्माननीय उद्योगपतींपैकी एक रतन टाटा यांनी पुन्हा एकदा आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला आणि करोडो लोकांची मने जिंकली. रतन टाटा यांच्या सारख्या उदार मनाचा व्यक्ती कोणीच नाही असं म्हणतात आणि टाटा समूहाच्या माजी अध्यक्षांनी आपल्या कृतीने पुन्हा एकदा हहे सिद्ध करून दाखवलं आहे. गुगल आणि ॲमेझॉन यांसह जगभरातील छोट्या-मोठ्या कंपन्या पैसा वाढवण्यासाठी कर्मचारी कपात करत असताना टाटांनी पुन्हा एकदा जगासमोर आदर्श ठेवला आहे.

१०. डोक्यात दगड घालून मित्राला संपवलं

संपूर्ण भारतामध्ये भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच भारतीय साक्ष अधिनियम असे तीन कायदे लागू झाले आहेत. तिन्ही नवीन कायदे लागू झाल्यानंतर १ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास विजापूर नाका पोलीस ठाणे येथे खबर मिळाली की, आसरा चौकाजवळील, शारदा सहकारी गृह निर्माण संस्था, सोलापूर या संस्थेच्या मोकळया मैदानात एका व्यक्तीचा खुन झालेला आहे.