वंचितची साथ सोडून शिवबंधनात; वसंत मोरे ठाकरेसेनेत प्रवेश करणार; मुहूर्त ठरला

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते वसंत मोरेंनी मुंबईत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राजकीय भवितव्याबद्दल चर्चा केली. ते लवकरच ठाकरेसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठीचा मुहूर्तदेखील निश्चित झाला आहे. वसंत मोरेंनी ठाकरेंची भेट घेतली, त्यावेळी तिथे राज्यसभेचे खासदार संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनसेला जय महाराष्ट्र करत वंचितकडून लोकसभा निवडणूक लढवलेल्या वसंत मोरेंना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांना अवघी ३२ हजार १२ मतं मिळाली. त्यांच्यामुळे पुणे लोकसभेत तिरंगी लढत होईल असं वाटत होतं. मोरेंमुळे काँग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना फटका बसेल अशी शक्यता वर्तवली जात होती. पण प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. भाजपचे मुरलीधर मोहोळ एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले.
माझ्यावर खोटेनाटे आरोप, दादांचा ‘संदेश’; ‘लाडकी बहीण’ थेट फडणवीसांवर बोलली, एका वाक्यात कोंडी
लोकसभा निवडणूक निकालाला महिना उलटलेला असताना आता वसंत मोरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. ९ जुलैला ते ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करतील अशी माहिती आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळण्याची शक्यता आहे. त्यांना हडसपरमधून उमेदवारी मिळू शकते. हडसपर विधानसभा मतदारसंघातील कात्रज परिसरात वसंत मोरेंची चांगली ताकद आहे. त्याचा फायदा ठाकरेसेनेला होऊ शकतो.
आमचं फिक्स वि. आमचं विमान; वादाचं नवं ‘उड्डाण’; फडणवीसांनी मिटवलेलं भांडण पुन्हा सुुरु
२०१९ मध्ये वसंत मोरेंनी मनसेच्या तिकिटावर हडपसरमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ३४ हजार ८०९ मतं घेतली. त्यांना केवळ १४.६२ टक्के मतं पडली. पण त्यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपेंना फायदा झाला. तुपे यांना ९२ हजार ३२६ मतं मिळाली. तर भाजपच्या योगेश टिळेकरांना ८९ हजार ५०६ इतकं मतदान झालं. मोरे यांच्यामुळे झालेल्या मतदानाचा लाभ तुपे यांना झाला.

मनसेत असताना पुणे शहराध्यक्ष असणाऱ्या मोरेंनी महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. २००७, २०१२ आणि २०१७ असे सलग तीनदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले. अशी कामगिरी मनसेच्या अन्य कोणत्याही नगरसेवकाला जमलेली नाही. राज ठाकरेंचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. पण राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबद्दल घेतलेल्या भूमिकेनंतर ते नाराज झाले. त्यानंतर राज यांनी लोकसभा न लढवण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला.