लोकसभेला ‘नरेटिव्ह’ने गेम केला, आताही त्याचीची भीती, भाजपचं ठरलं, जनतेच्या कोर्टात जायचं!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत आपण २३ जागांवरून ९ जागांवर आलो. आपल्या १३ जागा अशा आहेत, ज्या केवळ ४ टक्के मतांपेक्षा कमी मतांनी आपण हरलो आहोत. संपूर्ण इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून जास्त जागा एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत. आपली लढाई ही फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी इंडिया आघाडीचे फेक नरेटिव्ह कामी आले, अशा शब्दात भाजपच्या पराजयाचे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच विधानसभेचा याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन महाविकास आघाडीचे फेक नरेटिव्हची जनतेसमोर पोलखोल करू, असेही फडणवीस यांनी सांगितले.

भाजप आणि महायुतीची महाराष्ट्रात प्रचंड पिछेहाट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची चिंतन बैठक मुंबईतील वसंत स्मृती येथे पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, तसेच पक्षाचे सर्व खासदार आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Devendra Fadnavis : “ठाकरेंना सहानुभूती नाही, मुस्लिम मतांमुळे ठाकरे जिंकले” फडणवीसांचा दावा

आपल्यावर काही आभाळ कोसळलेले नाही, राज्यात केवळ २ लाख मते कमी पडली

आपल्यावर काही आभाळ कोसळलेले नाही. राज्यात केवळ २ लाख मते कमी पडली आहेत. याउलट आपण मुंबईत २ लाख अधिकची मते घेतली आहेत. १३० विधानसभा मतदारसंघात आपली आघाडी आहे. लोकसभेत प्रचंड ध्रुवीकरण प्रचंड झाल्याने आपली संख्या कमी झाली. संविधान बदलणार हा नरेटिव्ह सेट करण्यात विरोधक यशस्वी ठरले. पहिल्या तीन टप्प्यात तीव्रता अधिक होती. त्यामुळे २४ पैकी केवळ ४ जागा आपल्याला मिळाल्या. नंतर आपण त्याला प्रतिवाद केला आणि पुढच्या २४ जागांपैकी १३ जागा आपल्याला मिळाल्या. म्हणजेच आपण नरेटिव्ह खोडून काढण्यात कमी पडलो, असे फडणवीस म्हणाले.
Devendra Fadnavis: फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीला उत्तर देण्यात कमी पडलो- देवेंद्र फडणवीस यांची कबुली

जनतेत जाऊ, फेक नरेटिव्ह उघडे पाडू

विरोधक करत असलेला अपप्रचार आपण जनतेपर्यंत घेऊन जाऊ. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आपले पदाधिकारी जातील आणि विरोधकांच्या फेक नरेटिव्हची पोलखोल करतील, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे मनात किंतु-परंतु ठेवू नका. आपल्यात क्षमता आहे. आताची मतं कायम ठेवून एक टक्का मतं वाढविली तर विधानसभा आपण क्लीन स्वीप करू. आता कामाला लागा, असे निर्देश फडणवीस यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिले.

खोट्या नरेटिव्हद्वारे मते मिळविली, चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर टीकास्त्र

लोकसभा निवडणूक प्रचारात मविआ, इंडी आघाडीने खोट्या नरेटिव्ह द्वारे जनतेची दिशाभूल करून दलित, आदिवासी समाजाची मते मिळवली. हा अपप्रचार खोडून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते आगामी काळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली. तर त्याचवेळी विरोधकांचा हा खोटा नरेटिव्ह खोडून काढताना विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा विश्वास बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.