लोकसभेत मुसंडी, विधानसभेत काँग्रेस फ्रेश चेहरे देणार; ‘त्या’ ठरावामुळे अनेकांच्या आशा पल्लवित

पुणे: लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक १३ जागा जिंकत जोरदार मुसंडी मारणाऱ्या काँग्रेसनं आता विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी पक्षानं उमेदवारांच्या निवडीकडे विशेष लक्ष दिलं आहे. विधानसभेसाठी काँग्रेस अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. जयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा निर्णय विधानसभेला लागू होणार आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेस फ्रेश चेहऱ्यांना संधी देताना दिसेल.

काँग्रेसच्या साप्ताहिक बैठकीत पुण्यातल्या विधानसभा जागांबद्दल चर्चा झाली. लोकसभेला काँग्रेसनं पुण्याची जागा लढवली. कसब्यात भाजपला धक्का देऊन आमदार झालेले रविंद्र धंगेकर काँग्रेसचे उमेदवार होते. पण भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचा पराभव केला. धंगेकरांचा सव्वा लाख मतांनी पराभव झाला. गेल्या दोन निवडणुकांमध्ये पुण्यात काँग्रेसच्या उमेदवारांचा तीन लाखांहून अधिक मतांनी पराजय झाला होता. त्या तुलनेत यंदा काँग्रेसला चांगली मतं मिळाली.
अजित’दादा’ महायुतीत ‘छोटा भाऊ’ होण्यास तयार; कमी जागांच्या बदल्यात राष्ट्रवादीच्या अटी काय?
लोकसभेला रविंद्र धंगेकरांनी ४ लाख ६१ हजार ६९० मतं घेतली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कसबा, शिवाजीनगर, कँटॉन्मेंट, हडपसर, पर्वती या पाच जागावर लढवण्याची काँग्रेसची तयारी आहे. नव्या उमेदवारांसह काँग्रेस मैदानात उतरु शकते. पुणे काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे विधानसभेच्या ५ जागांची मागणी केली आहे.
Today Top 10 Headlines in Marathi: भाजप-शिवसेनेचं हॉटेल पॉलिटिक्स, तर पोलिसांना मिहीर शहा कसा सापडला? सकाळच्या दहा हेडलाईन्स
जयपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात एक महत्त्वाचा ठराव झाला. त्यानुसार दोन वेळा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला पुन्हा संधी मिळणार नाही. हाच नियम जर महाराष्ट्रात लागू झाला तर विधानसभा निवडणुकीत नवे चेहेरे पाहायला मिळतील. दरम्यान काँग्रेसने मागितलेल्या पाचपैकी दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत.

कोणाकोणाची नावं चर्चेत?
कसब्यात विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर किंवा नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. कँटॉन्मेंटमधून अविनाश बागवे इच्छुक आहेत. शिवाय लताताई राजगुरु, अविनाश साळवेंची नावं चर्चेत आहेत. पर्वतीमधून आबा बागुल यांची निवडणूक लढण्याची इच्छा आहे. शिवाजीनगरमधून दीप्ती चौधरी किंवा दत्ता भैरट यांचा विचार होऊ शकतो. तर हडपसरमधून बाळासाहेब शिवरकर इच्छुक आहेत. पण बळीराम डोळे, इम्रान शेख यांच्या नावांचीही चर्चा आहे.