लोकसभेत दाणादाण, महायुतीत घमासान; आता अजितदादा कुटुंबाचं पुनर्वसन करणार? प्लान काय?

मुंबई: लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीनंतर महायुतीत धुसफूस सुरु झाली आहे. मिशन ४५ हाती घेऊन निवडणुकीत उतरलेल्या सत्ताधारी महायुतीला अवघ्या १७ जागा मिळाल्या. तर विरोधात असलेल्या महाविकास आघाडीनं ३० जागांवर बाजी मारली. पक्ष, चिन्ह गमावूनही उद्धव ठाकरे, शरद पवारांनी प्रतिकूल परिस्थितीत चांगलं यश मिळवलं. काँग्रेसनं १३ जागा जिंकल्या. यानंतर आता महायुतीत खटके उडू लागले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत केवळ १ जागा मिळाली.

लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या राष्ट्रवादीला मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद होतं. पण त्यांच्याकडे लोकसभेचा केवळ १ खासदार असल्यानं कॅबिनेटची मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यानंतर आता अजित पवारांनी कुटुंबातील सदस्यांची राजकीय सोय लावण्यास प्राधान्य दिल्याचं बोललं जात आहे. अजित पवार त्यांची पत्नी सुनेत्रा किंवा मुलगा पार्थ यांची राज्यसभेवर वर्णी लावू शकतात.
‘ती’ खुर्ची अतिशय महत्त्वाची, २५ वर्षांपूर्वी भाजपचा घात झालेला; मोदी पुन्हा रिस्क घेणार?
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्या संपेल. राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल २०२२ मध्ये राज्यसभेवर निवडून गेले. त्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्येही पक्षानं त्यांनाच राज्यसभेवर पाठवलं. त्यावेळी त्यांनी आधीच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्या खासदारकीचा ४ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक आहे. यासाठी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यापैकी एकाची वर्णी लागू शकते. सुनेत्रा पवार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंकडून बारामतीत दीड लाख मतांनी पराभूत झाल्या. तर पार्थ पवार २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये सेनेच्या श्रीरंग बारणेंकडून २ लाख १५ हजार ९१३ मतांनी हरले आहेत.
मोदीजी, मला तुमच्या टिममध्ये घ्या, जबाबदारी द्या! POKमधील कार्यकर्त्याची विनंती
पार्थ पवार राज्यसभेवर जाण्यास उत्सुक आहेत. यासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंमध्ये पाऊण तास चर्चा झाली. आपल्याला राज्यसभेवर पाठवण्यात यावं अशी मागणी पार्थ पवारांनी फेब्रुवारीतही केली होती. सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभा लढणार असल्यानं जनतेत चुकीचा संदेश जाईल हा विचार करुन पक्षानं पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवलं नाही.

राज्यसभेच्या पुढील निवडणुकीत तुमच्या नावाचा विचार करण्यात येईल, असा शब्द पार्थ पवारांना देण्यात आला होता. चार वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असतानाही पटेलांनी खासदारकी सोडली आणि नव्या जागेसाठी निवडणूक लढवली. त्यामुळे ४ वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या राज्यसभेच्या जागावर निवडणूक होत आहे. ही जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी आणि महायुतीकडे आवश्यक संख्याबळ आहे.