लोकसभेत दाणादाण, काकांनी दाखवलं अस्मान; दादांच्या राष्ट्रवादीला आता सतावतेय वेगळीच चिंता

मुंबई: लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण उडाली. काकांची साथ सोडून गेलेल्या अजित पवारांना मतदारांनी दणका दिला. महायुतीत गेलेल्या अजित पवारांच्या पक्षाला चार जागा मिळाल्या. यातील तीन जागांवर राष्ट्रवादीचा पराभव झाला. बारामतीत अजित पवारांच्या होमग्राऊंडवर त्यांच्या पत्नीचा दीड लाख मतांनी पराभव झाला. या निकालामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थतता आहे. पक्ष, चिन्ह, सत्तेचं पाठबळ असताना मतदारांनी राष्ट्रवादीला नाकारलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापनदिन काल मुंबईत साजरा झाला. यावेळी पक्षाच्या नेत्यांची भाषणं झाली. पक्षाचा पारंपारिक मतदार असलेला अल्पसंख्याक समाज दूर गेल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना दूर गेलेला मतदार पक्षाकडे परत आणण्याचं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे.
चौहान इच्छुक, पण मोदी-शहांना नकोत; खट्टर मोदींना हवेत, पण संघाचा विरोध; भाजप अध्यक्षपदी कोण?
पक्षानं सगळ्याच समाज घटकांचा विचार करायला हवा, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी म्हणाले. यावेळी त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंचं उदाहरण दिलं. ‘नायडूंनी आंध्र प्रदेशात मुस्लिम आरक्षणाला पाठिंबा दिला. त्याच धर्तीवर मराठा समाजासह धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याचा विचार व्हायला हवं,’ असं सिद्दीकींनी म्हटलं.
Daggubati Purandeswari: भाजप एका दगडात मारणार दोन पक्षी? मित्रपक्षाला शह? दक्षिणेच्या ‘सुषमा स्वराज’ अचानक चर्चेत
नागरिकत्व सुधारणा कायद्यावर बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नेते नितीश कुमार यांनी घेतलेल्या भूमिकेकडे सिद्दीकींनी लक्ष वेधलं. जेडीयू आणि मित्रपक्षांनी या विषयावर प्रस्ताव मंजूर केलेला आहे. आपल्या पक्षाचीदेखील अशीच स्वतंत्र भूमिका असायला हवी. अल्पसंख्याकाच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी करण्यात आपण केलेल्या कामांची इतरांसाठी जाहिरात केली नाही, असं सिद्दीकी म्हणाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी चंद्राबाबू आणि नितीश बाबूंचा फॉर्म्युला वापरणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

मंत्री छगन भुजबळांनी पुन्हा एकदा अब की बार चारसो पारमुळे नुकसान झाल्याचं निरीक्षण मांडलं. ‘बुद्धिस्ट, मुस्लिम, दलित, आदिवासींनी आपली साथ का सोडली याचा विचार व्हायला हवा. विकास महत्त्वाचा आहे. पण मुस्लिमांबद्दल वापरण्यात आलेल्या शब्दांमुळे त्यांच्यात आपण एकटे पडल्याची भावना निर्माण झाली. त्यांच्या मनात भीती तयार झाली. अब की बार ४०० पारमुळे असुरक्षितता वाढली. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना झालेल्या अटकेमुळेही आदिवासी आपल्यापासून दूर गेले. विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीनं अल्पसंख्याक समाजाला पुन्हा जोडून घ्यायला हवं,’ असं भुजबळ म्हणाले.