रोज १० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पाठवा- गोराई गावाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

प्रतिनिधी, मुंबई : ‘या प्रश्नाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहा’, असा सल्ला देत मुंबई उच्च न्यायालयाने गोराई गावातील रहिवाशांसाठी दररोज प्रत्येकी १० हजार लिटरच्या १० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवण्याचा आदेश बुधवारी मुंबई महापालिकेला दिला. त्याचबरोबर गोराई गावातील सुमारे अडीच हजार कुटुंबांना पिण्याचे पाणी नियमित मिळण्याकरिता भूमिगत सक्शन पंप व टाकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचनाही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने केली.‘गोराई गावातील अडीच हजार कुटुंबांना केवळ उन्हाळ्यात नव्हे, तर एरवीही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सतावत आहे. आता तर पाणीटंचाईने आणखी भयावह स्थिती आहे’, असे निदर्शनास आणणारी जनहित याचिका ‘गोराई विलेजर्स वेल्फेअर असोसिएशन’ने केली आहे.

रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा, जास्त दराने विक्री केल्यास कृषी खात्याकडून कारवाईचा इशारा
‘गोराई गावाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी सक्शन पंप व भूमिगत टाकी बांधण्याचे काम सुरू करण्यात आल्याने सध्या पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. ते काम या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार असून, रहिवाशांना दररोज चार टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे’, असे म्हणणे महापालिकेने ज्येष्ठ वकील अनिल सिंग यांच्यामार्फत मांडले. तेव्हा, ‘महापालिकेने याप्रश्नी मानवी दृष्टिकोन बाळगावा. काम पूर्ण होईपर्यंत म्हणजे जवळपास नऊ महिने रहिवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवू नका. दररोज चार टँकर त्यांना पुरेसे ठरू शकणार नाही’, असे खंडपीठाने नमूद केले.

अखेरीस ‘रहिवाशांना दररोज प्रत्येकी १० हजार लिटरच्या १० टँकरने पाणी पुरवा. शिवाय ते पाणी योग्यरित्या शुद्धीकरण केलेले पिण्याचे पाणीच असेल, याची खबरदारी घ्या. सक्शन पंप व टाकीचे काम पूर्ण होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा विनाखंड सुरू ठेवावा’, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. तसेच याचिकेतील मुद्द्यांवर सहा आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश देऊन सुनावणी तहकूब केली.

महापालिकेची घटनात्मक जबाबदारी

‘सन १९९३मधील घटनादुरुस्तीने देशातील सर्व महापालिकांना घटनात्मक अधिकार मिळाले आहेत. त्याचबरोबरीने घटनात्मक जबाबदाऱ्यादेखील आल्या आहेत. त्यानुसार घरगुती व औद्योगिक वापरासाठी पाणी पुरवण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. परंतु, या प्रकरणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने त्याला अधिक प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिका आपली जबाबदारी झटकू शकत नाही. त्यामुळे महापालिका लवकरात लवकर रहिवाशांच्या समस्येचे निराकरण करेल, अशी आम्ही आशा करतो’, असेही खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले.