रिक्षा-टॅक्सी प्रवासात फसवणुकीचं ‘मीटर डाऊन’; मुंबईच्या अथर्वचं अ‍ॅप, आधीच कळणार भाडं

मुंबई : रिक्षा-टॅक्सीने प्रवास करताना नेहमीच्याच अंतरासाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळे दर मीटरवर दिसतात. वाहतूककोंडीत अडकल्यावर तर भाडेदरातील तफावत १० ते १५ रुपयांपर्यंतही जाते. यावेळी मीटरमध्ये छेडछाड करून लूट सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जातो. ही लूट टाळण्यासाठी १९ वर्षांच्या अथर्व गोंदवले या विद्यार्थ्याने रिक्षा-टॅक्सी मीटर हे एक विशेष अॅप विकसित केले आहे. याद्वारे अपेक्षित भाडेदर प्रवाशांना आधीच समजू शकणार आहे.

अथर्व हा सोमय्या इंजिनीअरिंग कॉलेजमधील कम्युटर सायन्समधील आर्टिफिशअल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स शाखेचा विद्यार्थी आहे. त्याने हे जीपीएस आधारित अॅप विकसित केले आहे. यामध्ये प्रवासाचे टप्पे नोंदवताच अपेक्षित भाडे आणि प्रवास वेळ एका क्लिकवर समजते. सध्या अॅप आधारित टॅक्सी सेवांमधून प्रवासाचा वेळ आणि दर समजतो. मात्र काळी-पिवळी टॅक्सी, रिक्षांचे दर आणि वेळ सांगणारे कोणतेही अॅप उपलब्ध नाही. मुंबईसारख्या शहरात मीटरमध्ये छेडछाड होत असल्याचा संशयही प्रवासी अनेकदा व्यक्त करतात. मुंबईबाहेर तर रिक्षा-टॅक्सी चालक मीटरप्रमाणे भाडे आकारतच नाहीत. वाटेल ती रक्कम वसूल केली जाते. या दोन्ही अडचणींवर उपाय म्हणून रिक्षा-टॅक्सी मीटर अॅप विकसित करण्यात आले आहे. रिक्षा-टॅक्सीच्या मीटर दरपत्रकाची माहिती सार्वजनिक आहे. याचा वापर यामध्ये करण्यात आला आहे, असे अथर्व याने सांगितले. वडाळ्यातील घरापासून घाटकोपरमधील कॉलेजमध्ये रिक्षाने जाताना मीटरदरात १० ते १५ रुपयांचा फरक येत असल्याचे अथर्वच्या लक्षात आले. यावर उपाय शोधताना या अॅपची निर्मिती झाल्याचे अथर्व सांगतो.
पुणेकरांनो, आता घरबसल्या करता येणार तुमच्या भागातील खड्ड्यांची तक्रार, जाणून घ्या टोल फ्री नंबर
मुंबईसह पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर अशा सहा शहरांत अॅप सुरू करण्यात येणार आहे. सध्या मुंबईत याची चाचणी सुरू झाली आहे. यामध्ये हे अॅप ८० टक्के बिनचूक असून काही तांत्रिक समस्या आहेत, त्या दूर करून प्रवाशांसाठी अॅप खुले करण्यात येणार आहे. प्रवासी आणि चालक केंद्रीत अशा दोन टप्प्यांत अॅप असेल. सध्या प्रवासी केंद्रीत अॅप पूर्णत्वास आले आहे. रिक्षा-टॅक्सींच्या भाडेदरात वाढ होते. रिक्षाचा भाडेदर १८ रुपयांपासून २३ रुपयांपर्यंत आणि टॅक्सीचा भाडेदर २२ रुपयांपासून २८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सुधारित भाडेदर मीटरमध्ये दिसण्यासाठी चालकांना मीटरचे प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असते. यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय चालकांना एक दिवस रिक्षा-टॅक्सी बंद ठेवून संबंधित कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. या अॅपवर अपडेट देऊन वेळखाऊ आणि खर्चिक प्रक्रिया टाळणे शक्य होणार आहे. याचबरोबर मीटर अॅपमध्ये आपत्कालीन सुविधा क्रमांक, प्रवासी सुविधा या बाबींचाही समावेश करून सर्वसमावेशक प्रवासी केंद्रीत अॅप विकसित करण्याचा प्रयत्न आहे, असा मानस अथर्वने व्यक्त केला.