राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ऑरेंज अलर्ट जारी, २१ जुलैला महाराष्ट्रात कशी असेल हवामान स्थिती?

मुंबई: हवामान खात्याने देशातील पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्यानुसार, येत्या काही तासांत उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि छत्तीसगडमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. सर्व राज्यांच्या विविध भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणी साचले असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Rain News: अतिवृष्टीचा ‘या’ जिल्ह्याला फटका! नद्यांना पूर अन् घरांची परझड, पुराच्या पाण्यात चिमुकला वाहून गेला
हवामान खात्याने राज्यातील विविध भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. सर्वात मोठा धोका रायगड आणि रत्नागिरीमध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली, खेड, मंडणगड, गुहागर तालुक्यात शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली होती. त्यामुळे पुन्हा एकदा शनिवारी संध्याकाळी उशिरा खेड शहराला पुराचा धोका निर्माण झाला होता. यामुळे खेड नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.मुसळधार पावसामुळे दापोली आणि खेड मंडणगड तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक नद्यांना पाणी आल्याने काही मार्ग बंद झाले होते. दापोली तालुक्यातील दाभोळ आणि नवसे परिसराला चांगलाच दणका दिला असून नवसे भाटी मार्गांवर दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीस काहीकाळ बंद झाला होता. तर मंडणगड तालुक्यात केळवत घाटातही दरड कोसळण्याची घटना घडली. गुहागर तालुक्यात शिर येथे डोंगर खचल्याची घटना घडली आहे.

२४ जुलैपर्यंत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. २० जुलै रोजी सर्व शहरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी रायगडसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगडमध्ये २१-२३ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरीत २१ आणि २२ जुलैला रेड अलर्टही आहे. २२ जुलै रोजी सिंधुदुर्गात रेड अलर्ट आहे. इतर सर्व ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.