राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडले : माधव भांडारी

वरद पाठक, पुणे : भारतीय राज्यघटनेत सर्वाधिक दुरुस्त्या नेहरू-गांधी परिवारांच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या राजवटीत झाल्या असून, राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडून संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावला आहे, असा आरोप भाजपचे नेते माधव भांडारी यांनी रविवारी केला. राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील धर्मनिरपेक्षता शब्दाबाबत आम्हाला काही अडचण नाही, मात्र समाजवाद या शब्दाबाबत चर्चा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.

शहर भाजपतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्षाचे नेते संदीप खर्डेकर, पुष्कर तुळजापूरकर आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य़घटनेत मोडतोड करण्यासाठी भाजपला बहुमत हवे असल्याच्या काँग्रेसच्या आरोपांचा भांडारी यांनी समाचार घेतला, तसेच गेल्या ७४ वर्षांत राज्यघटनेत झालेल्या दुरुस्त्यांचा तपशील सादर केला.

आतापर्यंत राज्यघटनेत १०५ दुरुस्त्या झाल्या असून, त्यापैकी ७५ दुरुस्त्या या काँग्रेसच्या राजवटीत झाल्या आहेत, तर पन्नासपेक्षा जास्त दुरुस्त्या या नेहरू-गांधी परिवारातील पंतप्रधानांच्या कार्यकाळात झाल्या आहेत. इंदिरा गांधी यांनी ४३ वी घटनादुरुस्ती करताना संकेत, कायदा, चौकट व नैतिकता अक्षरशः पायदळी तुडवली. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या मसुद्यात समाजवाद व धर्मनिरपेक्षता हे शब्द घुसडले. त्यावेळी विरोधकांना तुरुंगात डांबले होते. आता त्यांचे वारसदार भाजपवर राज्यघटनेची चौकट बदलण्याचा आरोप करत आहेत, परंतु काँग्रेसनेच राज्यघटनेची मोडतोड केली असून, भाजप संविधानाच्या मूळ चौकटीला धक्का लावणारे बदल कधीही करणार नाही, असेही ते म्हणाले.