राजकीय जन्म देणाऱ्या RSS ला भाजप संपवायला निघाला, ते संघावरही बंदी घालेल, ठाकरेंची टीका

प्रतिनिधी, मुंबई: ‘देशात एकच पक्ष राहील, असे काही दिवसांपूर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत, भाजप स्वयंपूर्ण झाला असल्याचे सांगतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) गरज नसल्याचे ते म्हणाले. ज्यांनी राजकीय जन्म दिला, त्या संघालाच भाजप नष्ट करायला निघाला असून, हा पक्ष ‘आरएसएस’लाही नकली संघ म्हणून त्यावर बंदी घालू शकतो,’ अशी टीका शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. ‘इंडिया’ आघाडी महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८पैकी ४६ जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अन्नसुरक्षा कायदा डॉ. मनमोहन सिंग सरकारचाच असल्याचा दावा या वेळी केला.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. शनिवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ‘इंडिया’तर्फे मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. उद्धव, खर्गे, पवार यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नितला, खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी या प्रसंगी उपस्थित होते. ‘भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करायचे व त्यांना पक्षात घेऊन सन्मान करायचा हे काम भाजप करीत आहे. या पक्षाने १० वर्षे महाराष्ट्राला बदनाम केले. मुंबईची लूट करून गुजरातला घेऊन गेले. ‘इंडिया’चे सरकार आल्यानंतर ही लूट थांबवणार आहे. चार जूनला देशातील ‘जुमलापर्व’ संपून ‘अच्छे दिन’ची सुरुवात होईल,’ असा विश्वास उद्धव यांनी व्यक्त केला. ‘आमच्याकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा कोण, हा प्रश्नच नाही. प्रश्न आहे तो भाजपचा; कारण त्यांच्याकडे एकच चेहरा आहे आणि तोही आता चालत नाही. भाजप काहीही म्हणू दे, भाजप आणि नरेंद्र मोदी म्हणजे ब्रह्मदेव नाहीत,’ अशा शब्दांत त्यांनी भाजप व मोदींना लक्ष्य केले.

‘मोदींची भाषा समाजाला तोंडण्याची’


‘नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे. राज्यघटनेला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग आदी यंत्रणांकडून विरोधकांना धमकी देऊन, प्रलोभने देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले. हे सर्व मोदींच्या इशाऱ्यावरच झाले. त्यांनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले. असा पंतप्रधान देशात आजपर्यंत झाला नाही,’ अशी टीका खर्गे यांनी या वेळी केली. ‘काँग्रेस सत्तेत आली तर अयोध्यातील राम मंदिरावर बुलडोझर चालवतील हा मोदींचा आरोप जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बुलडोझर संस्कृती ही भाजपची आहे, काँग्रेसची नाही. काँग्रेस असे काहीही करणार नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘अन्नसुरक्षा योजना ‘यूपीए’चीच’

‘‘इंडिया’चे सरकार आल्यास १० किलो मोफत धान्य देण्याची योजना ही नरेंद्र मोदींच्या योजनेवरून घेतली आहे, यात तथ्य नाही. डॉ. मनमोहनसिंग सरकारने अन्नसुरक्षा कायदा आणला व त्याअंतर्गत ही योजना आहे. ‘यूपीए’ सरकारनेच ही योजना आणली होती,’ असे पवार यांनी स्पष्ट केले. ‘निवडणुकीत सावरकर हा मुद्दाच नाही, तर त्यावर राहुल गांधी कशाला काय बोलतील,’ असा प्रश्नही त्यांनी मोदींनी राहुल यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना उपस्थित केला.