मोदी १० कॅमेरे लावून ध्यानाला बसले होते, तो मूकप्रचार नव्हता काय? राऊतांचे आयोगाला रोखठोक सवाल

मुंबई : निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत, त्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी १० कॅमेरे लावून ध्यानाला बसले होते आणि सगळे चॅनेल त्याचे लाईव्ह प्रक्षेपण करत होते, तो मूकप्रचार नव्हता काय? असा सवाल विचारत मंगळवारी दुपारी लोकसभेच्या निकालानंतर कोण कुणावर कारवाई करतेय ते पाहू, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला ललकारले आहे.मुंबईत मतदान प्रक्रिया सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल विचारून भाजपलाही लक्ष्य केले.
पत्रकार परिषद घेणे भोवले, उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

भाजप मतदान करा, रामललाचे फुकट दर्शन करायला मिळेल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. मतदारांना अशा प्रकारे प्रलोभन दाखवले होते. याबद्दलचे पत्र आम्ही निवडणूक आयोगाला पाठवले होते. पण त्याची साधी पोचपावती देखील आम्हाला मिळाली नाही. महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेचा गैरवापर कसा सुरु आहे याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाला एकूण १७ पत्रे पाठवली होती. निवडणुकीत पैशांचं वाटप सुरु असल्याची त्यातील काही पत्रे होती. त्यावर आयोगाने काय कारवाई केली, हे त्यांनी सांगावे, असे आव्हान राऊत यांनी दिले.

उद्धव ठाकरेंनी २० मे रोजी पत्रकार परिषद घेतली. त्याबद्दल भाजपने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून तक्रार केली. कर्तव्यदक्ष आयोगाने लगोलग कार्य तत्परता दाखवून कारवाईचे आदेश दिले. आम्ही या कारवाईचे स्वागत करतो. निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे. आयोग निष्पक्ष नाही, घटनेनुसार काम करत नाही. मंगळवारी दुपारी लोकसभेच्या निकालानंतर कोण कुणावर कारवाई करतेय ते पाहू, असे आव्हानच राऊत यांनी दिले.