मोदींचे महाराष्ट्र दौरे यंदा का वाढलेत? शिंदे, ठाकरेंचा उल्लेख करत फडणवीसांनी सांगितलं कारण

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातलं मतदान आज होतंय. राज्यातील ११ जागांवर आज मतदान होतंय. मागील निवडणुकीत मिळवलेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान भारतीय जनतासमोर आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या घडामोडी पाहता भाजपसाठी निवडणूक आव्हानात्मक आहे. त्यामुळे भाजपनं राज्यात ताकद पणाला लावली आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा वाढल्या आहेत. त्यामुळे भाजपला ही निवडणूक जड जातेय का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महाराष्ट्रानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देण्याचा निर्णय घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. आम्ही २०१४ आणि २०१९ मधील कामगिरीची पुनरावृत्ती करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा मोदींच्या सभा का वाढल्या, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत बराच फरक असल्याचं फडणवीस म्हणाले.
तुम्हीच अजित पवारांवर आरोप केले, मग आता त्यांना सोबत का घेतलं? फडणवीसांनी टाईमलाईन सांगितली
गेल्या निवडणुकीत ९ सभा घेणाऱ्या मोदींनी यंदा १८ सभा घेतल्या आहेत. ही निवडणूक भाजपला जड जाऊ लागलीय का, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. त्यावर मोदींनी १८ रॅली केलेल्या नाहीत. पण गेल्या वेळच्या तुलनेत यंदा अधिक सभा झाल्या आहेत. यंदा अधिक वेळ मिळाल्यानं सभांची संख्या वाढली आहे, असं फडणवीसांनी सांगितलं.

गेल्या निवडणुकीचं वेळापत्रक आटोपशीर होतं. त्यामुळे मोदींना फार सभा घेता आल्या नाहीत. याशिवाय आमच्या मित्रपक्षांसाठी मोदींच्या सभा व्हाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. आधी शिवसेना, राष्ट्रवादी एकसंध पक्ष होते. यंदा शिंदेसेना आहे. त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे आहेत. काही ना काही मतं ठाकरेंच्या सोबत जातील. यासाठी मोदींच्या सभांची संख्या वाढवण्यात आली आहे, असं फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात महायुती चांगली कामगिरी करेल. लोकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. जनता मोदींच्या सोबत आहे, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.